आम्हाला मराठा समाजाला न्याय द्यायचा आहे – शरद पवार
नवी दिल्ली, दि. 11 – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली. यावरुन राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधकांना राजकारण करायचं आहे आणि आम्हाला मराठा समाजाला न्याय द्यायचा आहे अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत मराठा आरक्षणावर भाष्य केलं
यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर फेरविचार याचिका दाखल करण्याचा पर्याय राज्य सरकारला सूचवला आहे. आज राज्य सरकारच्या बैठकीत योग्य निर्णय झाल्यास आंदोलन होणार नाही, असं पवार म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाचा तमिळनाडू, महाराष्ट्रासाठी वेगवेगळा निकाल. ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणाची मागणी गैर नाही. पण मला सर्वोच्च न्यायालयावर शंका घ्यायची नाही आहे, असं शरद पवार म्हणाले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर टीका करत सरकारने योग्य लक्ष दिलं नाही आहे, असा आरोप केला. यावर बोलताना शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांनी प्रश्न सोडवण्यात रस नाही, अशी टीका केली. फडणवीसांना प्रश्न सोडवण्यात रस नाही आहे. त्यांना या निमित्ताने राज्यातील सामाजिक सौख्य आहे ते बिघडवायचं आहे असं दिसतंय, असं शरद पवार म्हणाले. मला जेवढा कायदा कळतो त्याप्रमाणे मराठा आरक्षणा संदर्भात अध्यादेश आणू शकतो. फेरविचार याचिका दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. आम्हाला मराठा आरक्षण प्रकरणी राजकारण करायचं नाही तर विद्यार्थ्यांना दिलासा द्यायचा आहे. मराठा आरक्षणावरुन केंद्र-राज्य असा वाद नको असं आवाहन शरद पवारांनी केलं.
