कंगना मुंबईत आली: शिवसेनेचं नाक कापलं गेलं – नारायण राणे
मुंबई – कंगना रनौत जर मुंबई, महाराष्ट्राचा अपमान करत असेल, तर कायद्यात तरतूद आहे, कारवाई करा. मुख्यमंत्री मातोश्रीच्या पिंजऱ्यात कशाला बसलाय,” अशी खोचक टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली. तसेच, बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत मुंबईत आली. तिच्या घरी गेली. तिने प्रतिक्रिया दिली आणि शिवसेनेचं नाक कापलं. मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था आहे का? हा माझा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रश्न आहे. असंही ते म्हणाले.
आज मराठा आरक्षणावर स्थगिती आली आहे. त्यावर बोलताना राणे म्हणाले की, “राज्य सरकार हे मराठा आरक्षण देण्याच्या मानसिक स्थितीत नव्हतं. त्यामुळेच त्यांनी सुप्रीम कोर्टात नामांकित वकील दिले नाहीत. राज्य सरकारने नात्या-गोत्यातले साधे वकील उभे केले. चांगला वकील सुप्रीम कोर्टात दिला नाही, मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली यासाठी सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार.”
“अधिवेशनात बिलं ही चर्चेशिवाय मंजूर झाली. पुरवण्या मागण्यांवर चर्चा नाही. देवेंद्र फडणवीसांनी यांनी अभ्यासपूर्ण भाषण केलं. त्यांनी कोरोना स्थितीवर प्रकाशझोत टाकला. पण उद्धव ठाकरेंनी एकाही प्रश्नाला उत्तर दिलं नाही. बेकारी वाढतेय, शेतकऱ्यांचे, मजूरांचे प्रश्न आहेत. हे सर्वजण अडचणीत आहे. त्यांच्या घरात आज अन्न नाही, यावर का बोलले नाहीत. सरकार म्हणून काय करणार याबद्दल काही बोलले नाही,” अशी टीका नारायण राणेंनी केली.
“कोकणात वादळाच्या मदतीचे आजपर्यंत एकही रुपया पोहोचलेला नाही. मुख्यमंत्र्यांपेक्षा एखादा सरपंच चांगला बोलला असता,” असे नारायण राणे म्हणाले.
“राज्य सरकारने दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन घेतलं नसतं, तर बरं झालं असतं. अशाप्रकारे जर पुढच्यावेळी अधिवेशन घेण्याची वेळ आली तर ते मातोश्रीच्या गच्चीवर घ्या. जवळपास दोन-अडीच तासांचं. विरोधीपक्षाला 15 मिनिटं, सत्ताधाऱ्यांना इतर वेळ, याला काही अर्थ नाही. त्याला मी अर्थहीन अधिवेशन म्हणेन,” अशी टोला नारायण राणेंनी लगावला.
