देशाचे कृषी क्षेत्र, शेतकरी हेच आत्मनिर्भर भारताचा आधार – पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली, दि. 27 – ‘आमचे कृषी क्षेत्र, आमचे शेतकरी हे कोरोनाच्या कठीण काळातले एक जीवित उदाहरण आहे. देशातचे कृषी क्षेत्र, आमचे शेतकरी हे आत्मनिर्भर भारताचा आधार आहेत. ‘ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ च्या माध्यमातून देशाला संबोधित केले. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले.
पुढे मोदी म्हणाले की, ‘शेतकरी मजबूत असतील तर आत्मनिर्भर भारताचा पाया मजबूत होईल. अलीकडच्या काळात या क्षेत्राने अनेक बंधनातून स्वतःला मुक्त केले आहे. अनेक शेतकऱ्यांची पत्रे मला मिळत राहतात. या क्षेत्रामध्ये कशा प्रकारे बदल होत आहे, याबाबत ते माहिती देत असतात.’
‘आपण सर्व लोक नव्या पिढीला कथांच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांबद्दल, महान माता आणि भगिनींबद्दल माहिती देऊ शकतो. कथाकथन जास्त लोकप्रिय कसे करू शकतो, यासाठी पोषक वातावरण कशाप्रकारे तयार करता येईल, याचा विचार करून त्यादिशेने काम केले पाहिजे’, असे मोदी ‘मन की बात’ कार्यक्रमात म्हणाले.
‘ज्या प्रथा आपल्या पूर्वजांनी सुरू केल्या होत्या, त्या किती महत्त्वाच्या होत्या आणि जेव्हा आपण त्यांचे पालन करत नाही तेव्हा त्यांचा आपल्याला किती अभाव जाणवतो, याची जाणीव आपल्याला या काळात झाली असेल. अशीच एक प्रथा म्हणजे गोष्टी सांगण्याची कला आहे’, असे मोदी म्हणाले.
