कंगना म्हणाली 9 तारखेला येतेय हिंम्मत असेल तर रोखा
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सध्या तिच्या ट्वीटमुळे चांगलीच चर्चेत आहे. गुरूवारीच कंगनाने मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरसोबत (POK) केली असल्याने कंगनाच्या या वक्तव्यामुळे मराठी कलाकरांसह सोशल मीडियावर नेटकरी चांगलेच संतप्त झाले असून तिच्यावर निशाणा साधला आहे. मात्र इतकं होऊनही कंगनाने आज पुन्हा एकदा ओपन चॅलेंज देणारं ट्वीट केल्याचे समोर आले आहे.
”मी मुंबईत येऊ नये अशी मला बरेच लोक धमकी देत आहेत. म्हणूनच मी येत्या आठवड्यात मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई विमानतळावर उतरण्याआधी मी मुंबईत येण्याची तारीखही कळवेन. कुणाच्या बापाची हिम्मत असेल तर रोखून दाखवा.” असं कंगनाने धमकावणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
कंगना हे खुल आव्हान देत ती असेही म्हणाली की, ”९ सप्टेंबर रोजी मी मुंबईत येईन. मुंबईत विमानतळावर उतरण्याआधी वेळ सांगेन. सोशल मीडियावरून धमक्या देणाऱ्यांपैकी कुणामध्ये हिंम्मत असेल तर रोखून दाखवा…”
मुंबईविरुद्ध वक्तव्य केल्यानंतर संतप्त ट्वीट करत मराठी कलाकारांनी कंगनाला चांगलेच सुनावले आहे. बॉलिवूडसह मराठी कलाकारही कंगनावर चांगलेच संतप्त झाले असून आता कंगनावर सोशल मीडियावरून टीकेचा भडीमार सुरु झाला आहे. ‘कृतज्ञता दाखवता येत नसेल तर कृतघ्न तरी होऊ नका. #ILoveMumbai’, अशा शब्दांत काही कलाकारांनी कंगनाला सुनावल्याचे दिसत आहे.
कंगनाने महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या टीकेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंगनाला चांगलेच सुनावले आहे. यासह मुंबईत भीती वाटत असेल तर तिनं परत येऊ नये, असेही राऊत कंगनाला म्हणाले होते. यावरच कंगनाने राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. हे प्रत्युत्तर देताना पुन्हा एकदा कंगनाने ट्विट केले असून त्यात ती म्हणाली, “शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला धमकी दिली आणि पुन्हा मुंबईत परत येऊ नये असे म्हटले. यापूर्वी मुंबईच्या रस्त्यांवर स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?”
