Tuesday, June 16, 2026
PUNE

27 सप्टेंबरला “ वर्ल्ड ट्री डे “


पुणे दि.25:-विविध सरकारी संस्था आणि व्यक्तींद्वारे वृक्षारोपण केले जाते. या प्रयत्नांना एकात्मिक आणि व्यापक स्वरूप देण्यासाठी 27 सप्टेंबर या दिनी “ वर्ल्ड ट्री डे ” ही संकल्पना राबविण्यात येते. वृक्ष- संरक्षण आणि संवर्धनाचा संदेश देण्यासाठी हा दिवस पाळला जातो, असे पुणे विभागीय वन अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

“वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे” हा संत तुकारामांचा अभंग वृक्षांचे महत्व अधोरेखित करतो. भारतीय संस्कृतीत अशा प्रकारचे वृक्षप्रेम अनादी कालापासून आहे, तसेच त्यांचे संवर्धन करण्याचा सातत्याने प्रयत्न केला गेला आहे. भारतीय सण, उत्सव आदींमधूनही वृक्षांना अधिष्ठान प्राप्त झालेले आहे.
मात्र सध्या जागतिक तापमानात सातत्याने होणारी वाढ, हवामान आणि ऋतू बदल,अनियमित पर्जन्यमान, अतिवृष्टी किंवा दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा आपण सामना करत आहोत. यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी वृक्ष लागवड आणि संवर्धन यांची नितांत आवश्यकता आहे.
वृक्षांच्या मुळांपासून ते पानांपर्यंत सर्वकाही मानवास आणि इतर पर्यावरण सृष्टीस उपयुक्त आहे. मानवाच्या अन्न, वस्त्र, निवारा या ज्या तीन मूलभूत गरजा आहेत, त्यांची पूर्तता निसर्गातून म्हणजेच वृक्षांकडून होते. सजीवांना ऑक्सिजन पुरविणे, हवेचे प्रदूषण रोखणे, फळे-फुले-लाकूड पुरविणे, ऊन वाऱ्यापासून मानवाचे संरक्षण करणे हे वृक्षांचे काही उपयोग आहेत याखेरीज वृक्षांचे आयुर्वेदातील स्थान सर्वश्रुत आहेच कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर अनेक आरोग्यतज्ज्ञ विविध औषधी वनस्पतींसंदर्भात बोलताना दिसतात.
असंख्य प्राणीमात्र अन्न आणि अधिवासासाठी वृक्षांवर अवलंबून आहे. कृषी आणि ग्राम विकास मंत्रालयाच्या अहवालानुसार , एक झाड दरवर्षी सुमारे सुमारे 1,00,000 चौ मी परिसरातील प्रदूषित हवा शुद्ध करते आणि सुमारे 700 किलो ऑक्सिजन तयार करून 20 टन कार्बन डायऑक्साईड शोषून घेते. एक झाड उन्हाळ्यात 4 अंशांपर्यंत तापमान कमी करण्यात मदत करते. घराजवळील एक झाड ध्वनिक भिंतीसारखे आहे – ते आवाज शोषून घेते आणि आवाज पातळी कमी करते.

राष्ट्रीय वन धोरण 1988 नुसार, एकूण भूभागापैकी 33 टक्के क्षेत्रावर वन असणे महत्वाचे आहे. महाराष्ट्रातील वनांचे प्रमाण 20 टक्के आहे हे प्रमाण 33 टक्के पर्यंत नेण्याकरीता शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. या ईश्वरीय कार्यात शासकीय विभागांबरोबरच शाळा, महविद्यालये, पर्यावरण प्रेमी, अशासकीय संस्था, इतर सामाजिक आणि औद्योगिक संस्थांचा सहभाग लाभत आहे. सर्वांच्या सहकार्यातून नक्कीच हरित महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण होईल, असेही विभागीय वन अधिकारी कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading