भाजपा नेत्यांनी ‘मराठा आरक्षणाबाबत’ चिथावणीखोर वक्तव्ये करू नये – गोपाळदादा तिवारी
पुणे : मराठा समाज आरक्षण प्रकरणी ‘महाविकास आघाडी’ सरकारने सर्वोच्च न्यायालयात सर्वतोपरी बाजू मांडली असताना न्यायालयाने दिलेल्या निकालावर राज्यातील भाजप नेते ‘पातळी सोडून टीका’ करीत आहेत. हे कृत्य घटनाविरोधी व सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारे आहे..! ही वक्तव्ये ‘सामाजिक उद्रेकास’ कारणीभूत ठरणारी आहेत, याचे ‘उचित भान’ या नेत्यांनी ठेवावे असा इशारा काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिला आहे.
मराठा समाज आरक्षण हे सर्वस्वी ‘सर्वोच्च न्यायालयाच्या व संविधानाच्या अख्यत्यारीतील’ विषय आहे, हे न समजण्या एवढे भाजपा नेते अपरिपक्व नाहीत..! चिथावणीखोर वक्तव्ये करून ते त्यांच्या बुद्धीची दिवाळखोरी प्रकट करीत आहेत.
‘मराठा समाज आरक्षणाच्या’ संवेदनशील प्रश्नावर’ मराठा समाजाच्या तरुणांची माथी भडकविण्याचे दृष्टकृत्य ही नेते मंडळी जाणीवपूर्वक करीत आहेत काय(?)
असा सवाल गोपाळदादा तिवारी यांनी केला आहे.
राज्याच्या मे. पोलीस महासंचालकांनी या वक्तव्यांची गंभीर्याने नोंद घ्यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली..!
न्यायालयात आप-आपली बाजू मांडत असतांना कोणताही पक्षकार कमी पडत नसतो. परंतु त्यानंतर निकाल देणे हे मात्र सर्वस्वी न्यायालयाच्या अख्यत्यारीत येत असते. तरी देखील आरक्षणास स्थगिती च्या निर्णयावर ‘महाविकास आघाडी’ सरकारने सखेद आश्चर्य व्यक्त करून ‘फेरविचार याचिका’ दाखल करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, हे देखील लक्षात घेणे गरजेचे आहे..!
याविषयी महाविकास आधाडी सरकार तर्फे कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. याचेही उचित भान भाजपा नेत्यांनी ठेवून ‘सामाजिक सलोख्याच्या’ उत्तरदायित्त्वाच्या जबाबदारीची जाणीव ठेवावी. किमान याविषयी तरी ‘उथळ, संधीसाधुपणाचे स्वार्थी व निंद्य राजकारण’ करू नये असा इशारा गोपाळदादा तिवारी यांनी दिलेल्या प्रसिध्दी निवेदनात दिला आहे.
एकतर केंद्रातील मोदी सरकारने ‘खाजगीकरणाचा सपाटा लावून ‘शासकीय संस्था व शासकीय नोकऱ्याच्’ संपुष्टात आणण्याचे काम चालू केले आहे. खरेतर, त्याविरुद्ध भाजपा नेत्यांनी आवाज उठवून त्यांना खाजगीकरणापासून रोखावे, कारण ‘सरकारी नोकऱ्या व संस्था शाबूत राहिल्या’ तरच् ‘आरक्षणाला महत्त्व राहील’ असे ही गोपाळदादा तिवारी यांनी दिलेल्या प्रसिध्दी निवेदनात म्हटले आहे.
