मोदींच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेस ‘सत्ताधारी भाजपाचाच्’ खो – गोपाळदादा तिवारी
पुणे दि.२६ – महापालिकेत ‘काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची’ सत्ता असताना स्मार्ट सिटी योजनेमध्ये देशात पहिल्या ‘पाच शहरात’ (क्र.२चे) स्थान पटकविणाऱ्या ‘पुणे शहराचे’ रँकिंग ‘एक हाती सत्ता’ असलेल्या भाजपाच्या काळात चक्क २८ व्या क्रमांकावर घसरले आहे. या अपयशाची जबाबदारी भाजपाने स्वीकारून स्मार्ट सिटी योजनेच्या त्रुटी दूर करून ‘महापालिका निवडणुकीपूर्वी’ पुणेकरांना दाखवलेल्या ‘स्मार्ट सिटीच्या स्वप्नांची’ पूर्तता करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली आहे.
पुणे शहराने पहिल्या ३ वर्षात मिळालेल्या ६०० कोटी रुपयांचा निधी ‘वेळेत खर्च केला नाही’ त्यामुळे पुणे शहराला पुढचा निधी मिळू शकलेला नाही. हे अत्यंत धक्कादायक व लाजीरवाणे आहे. स्मार्ट सिटी योजने अंतर्गत पुणे शहराने नवीन योजना राबविल्या नाहीत. योग्यप्रकारे अंमलबजावणी केली नाही यामुळे हे मानांकन घसरले आहे. स्मार्ट सिटीच्या योजनेतील या अपयशाला सत्ताधारी भाजपच् जबाबदार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २६ जून २०१६ रोजी “देशातील महत्वाकांक्षी “१०० स्मार्ट सिटीच्या” कामांचा शुभारंभ देशामध्ये “पुणे शहरास प्राधान्य” देऊन करण्यात आला. यामध्ये पुणे शहरातील कस्तुरबा झोपडपट्टी पुनर्विकास, नागरीकांना वितरीत करण्यात येणारे विविध सुविधांचे स्मार्ट कार्ड, लाईट हाऊस इ. १४ योजनांचा शुभारंभ केला होता. (तत्कालीन महापौर श्री प्रशांत जगताप यांना महतप्रयासाने व्यासपीठावर बसवले गेले ही घटनाच ‘योजना सर्वस्वी केंद्र सरकार’ अखत्यारीत असल्याचे द्योतक होते..)
पुणे “महापालिका निवडणुका” डोळ्यांसमोर ठेऊन, याचा जोरदार ‘गाजावाजा’ करण्यात आला होता…! आता स्मार्ट सिटी योजनेमुळे ‘पुणे शहर – फॉरेन सिटी प्रमाणे’ स्मार्ट बनणार असे स्वप्न देखील दाखविण्यात आले होते. त्यानुसार पुणेकरांनी भाजपचे १०० हुन अधिक नगरसेवक निवडून देऊन, त्यांना एकहाती सत्ता ही दिली. मात्र साडे तीन वर्षांनी स्मार्ट सिटी योजनेचा पूर्ण बोजवारा उडालेला दिसत आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत औंध-बाणेरमधील चांगले फुटपाथ उखडून पुन्हा दुसरे फुटपाथ बांधण्याशिवाय काहीही केले नाही. औंध-बाणेरचा मॉडेल एरिया विकसित झाल्यानंतर शहरातील इतर भागात स्मार्ट सिटीचे काम होणार होते, मात्र अजून ‘मॉडेल एरियाच’ विकसित झालेला नाही, तर पुढील अपेक्षा करणे व्यर्थ आहे असे ही गोपाळ तिवारी यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हंटले आहे..
स्मार्ट सिटी योजने अंतर्गत मिळालेला निधी ही खर्च करता आलेला नाही. महापालिकेच्या राजकीय पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप न होता वेगाने विकासकामे व्हावीत म्हणून, स्मार्ट सिटीच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा तयार केली गेली, मात्र प्रत्यक्षात वेगाने विकास कामे होण्याऐवजी वेगाने कामे रखडली आहेत..!
पुणे शहरातचे मानांकन २८ व्या क्रमांकावर घसरल्यामुळे पुणे शहराच्या नावलौकीकला मोठा धक्का बसला आहे. पुणे मनपातील सत्ताधारी भाजप या अपयशास जबाबदार असुन, मुठा नदी सुधारणाच्या ‘जायका प्रकल्प’ प्रमाणे याची अवस्था होऊ नये हीच् अपेक्षा आहे..
