Tuesday, September 1, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

सुप्रिया सुळेंवर अतुल भातखळकरांचा खोचक टोला; ‘उरला-सुरला पक्ष सांभाळा, जनतेची सेवा करा’

मुंबई  : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी विविध मुद्द्यांवरून राज्य सरकारवर टीका केली होती. त्यांच्या टीकेला भाजप नेते अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर देत सुळेंवर जोरदार निशाणा साधला. त्यांच्या पक्षात आता टोयोटा इनोव्हामध्ये बसतील एवढेच आमदार उरले आहेत, असा खोचक टोला भातखळकर यांनी लगावला.
राज्यातील प्रश्न सोडवण्यासाठी महायुती सरकार आघाडीवर असून, सुप्रिया सुळे यांनी उरलेला पक्ष सांभाळण्यासोबत जनतेची सेवा करण्यावर लक्ष केंद्रित करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत बोलताना भातखळकर यांनी सरकारचा जरांगेंशी सातत्याने संवाद सुरू असल्याचे सांगितले. जात पडताळणी समित्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार काम करतात आणि या संदर्भातही संबंधितांशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
परभणीचे खासदार बंडू जाधव यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्याला जरांगे पाटील यांनी विरोध दर्शवला आहे. यावर भातखळकर म्हणाले की, सरकार शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करत आहे. शिवसेना महायुतीतील घटक पक्ष असल्याने त्यांना स्वतःचे कार्यक्रम आयोजित करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
दरम्यान, रिक्षाचालकांना मराठी शिकण्यासाठी देण्यात आलेल्या मुदतवाढीवरही भातखळकर यांनी भाष्य केले. राज्यात प्रत्येकाला कामचलाऊ मराठी येणे आवश्यक असल्याचे सरकारचे धोरण आहे. मात्र, मराठी शिकण्यासाठी कोणावरही जबरदस्ती केली जाणार नाही. पुढील एक वर्षाच्या कालावधीत रिक्षाचालकांसह संबंधित सर्वजण आवश्यक तेवढी मराठी भाषा शिकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading