दोन दिवसांसाठी मुंबईत या आणि तिसऱ्या दिवशी विजयाचा गुलाल अंगावर घ्या – मनोज जरांगे
परभणी: प्रतिनिधी
मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून सरसकट आरक्षण देण्यात यावे आणि सगेसोयरेच्या अध्यादेशाची अंमलबजावणी व्हावी, या प्रमुख मागण्यासाठी पुन्हा एकदा मराठा समाजाचा मोर्चा 29 ऑगस्ट रोजी मंत्रालयावर धडकणार आहे. दोन दिवसांसाठी मुंबईत या आणि तिसऱ्या दिवशी विजयाचा गुलाल अंगावर घ्या, अशी ग्वाही मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला दिली आहे.
गंगाखेड तालुक्यातील धारसुर येथे चावडी सभेत बोलताना मनोज जरांगे यांनी मोर्चाची घोषणा केली. या मोर्चामध्ये तब्बल तीन ते चार कोटी मराठा बांधव सहभागी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा मोर्चा 27 तारखेला अंतरवाली सराटी येथून सुरू होऊन पैठण, शेवगाव, अहिल्यानगर, आळेफाटा, माळशेज घाट, कल्याण, वाशी, चेंबूर मार्गे मंत्रालयाकडे जाईल.
मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी मनोज जरांगे पाटील मराठवाड्यात ठिकठिकाणी चावडी सभा घेत आहेत. या मोर्चाच्या निमित्ताने लाखो मराठा बांधव रस्त्यावर उतरतील आणि मुंबईला तीन ते चार कोटी समाज बांधव मंत्रालयावर धडक देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
