Thursday, June 4, 2026
Latest NewsPUNETECHNOLOGY

सायबर सुरक्षेचे कल्चर सर्वत्र रुजवण्याची गरज – क्विकहिलचे उपसंस्थापक संजय काटकर यांचे मत

पुणे, :  आजच्या घटकेला सायबर सुरक्षा हा विषय महत्वाचा बनला आहे, त्यामुळे भविष्यात सायबर सुरक्षेचे कल्चर सर्वत्र रुजवण्याची आवश्यकता असल्याचे मत क्विकहिल कंपनीचे सह संस्थापक व सह व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर यांनी व्यक्त केले.

सॉफ्टवेअर एक्सपोर्टर अशोसिएशन पुणे यांची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली. यावेळी आयोजित  कार्यक्रमाला काटकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असताना बोलत होते. कोरेगाव पार्क येथील हॉटेल ब्लू डायमंड येथे सदर कार्यक्रम संपन्न झाला. सीपचे नवनिर्वाचित अध्यक्ष शिवराज साबळे, उपाध्यक्षन शिवेष विश्वनाथन, सचिव विद्याधर पुरंदरे, खजिनदार आनंद रानडे आणि माजी अध्यक्षा विनिता गेरा यावेळी उपस्थित होते.

सायबर सुरक्षा हा विषय दिवसेंदिवस अधिक महत्वाचा बनत चालला आहे, त्यामुळे प्रत्येकाने त्याकडे अधिक बारकाईने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे असणारा डेटा सुरक्षित ठेवण्याकडे  अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सायबर चोरटे माहिती चोरून त्याचा वापर वेगळ्या कामासाठी करू शकतात. अलीकडच्या काळात रॅमसनवेअर अटॅक, डेटा एक्स्टर्शन, बिझनेस इमेलची चोरी करून त्याच्या आधारे फसवणूक करणे, एएआय तंत्राचा वापर करून फसवणूक करणे असे प्रकार घडत आहेत. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत सुमारे सात हजार कोटी रुपयांची सायबर फसवणूक झाली आहे, त्यामुळे प्रत्येकाने त्याबाबत अधिक काळजी घेण्याची गरज असाल्याचे काटकर यावेळी म्हणाले.

एआय तंत्राचा वापर करण्याचे प्रमाण वाढत आहे. आगामी काळात त्याचा वापर हा सायबर सुरक्षेमध्ये देखील करता येऊ शकतो, त्यामुळे कामामध्ये सुलभता येण्यास मदत होऊ शकते. सॉफ्टवेअर कंपनीच्याबरोबर विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींनी आपली सॉफ्टवेअरची यंत्रणा कायम अपडेट ठेवणे, भक्कम पासवर्ड ठेवणे, कर्मचारी वर्गाला सायबर सुरक्षेचे प्रशिक्षण देणे, सिक्युरिटीच्या बाबत अधिक माहिती देऊन त्याचे सायबर सुरक्षेचे ज्ञान वाढवण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे काटकर यावेळी म्हणाले.

आपल्या शालेय शिक्षणापासून ते कंपनीच्या यशापर्यंतचा आलेख काटकर यांनी यावेळी उलगडला. कंपनी सुरु केल्यानंतर केलेले प्रयोग, त्यामध्ये आलेले अनुभव इथपासून ते घरातून शिक्षणासाठी मिळालेले पाठबळ, आई-वडील, भाऊ यांनी केलेली मदत, वाकडेवाडीच्या चाळीमध्ये राहतानाच्या आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सीच्या तंत्रामुळे पुढल्या दहा वर्षांमध्ये पुण्याचा चेहरा बदलला जाणार आहे, त्यामुळे इथे काम करण्याच्या मोठ्या संधी असल्याचे  सॉफ्टवेअर एक्सपोर्टर अशोसिएशन पुणेचे नवनियुक्त अध्यक्ष  शिवराज साबळे यावेळी म्हणाले.

तंत्रज्ञानामध्ये नवीन बदल होत आहेत, त्याचा लाभ घेऊन नवीन प्रयोग करण्याच्या संधी उपलब्ध आहेत. समाजातील वेगवेगळ्या घटकांना एकत्र करून त्यांच्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, पुण्याचा आवाज होणे, भविष्याचा वेध घेत नव्या योजना तयार करून त्याची अंमलबजावणी करणे असे उपक्रम आगामी काळात राबवण्याचे नियोजन असल्याचे साबळे यावेळी म्हणाले.

सीपच्या कार्यकारी समितीचे सदस्य आणि माजी अध्यक्ष, नितीन देशपांडे, रामप्रसाद एस, आशुतोष पारसनीस, प्रशांत के एस, अभिजित अत्रे आदी मान्यवर देखील कार्यक्रमाला उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading