राज्यात कांद्याचा पुरेसा साठा; टंचाईची शक्यता नाही, शेतकरी संघटनेचा दावा
पुणे : प्रतिनिधी
देशासह महाराष्ट्रात कांद्याचा पुरेसा साठा उपलब्ध असून देशांतर्गत मागणी भागवून निर्यात करण्याइतके उत्पादन झाले आहे. त्यामुळे आगामी दोन महिन्यांत कांद्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता नसल्याचा दावा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केला.
राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी कांद्याची संभाव्य टंचाई निर्माण होण्याबाबत केलेला दावा दिघोळे यांनी फेटाळून लावला. सरकारने बाजारात हस्तक्षेप करून कांद्याचे दर कमी करण्याचा प्रयत्न केल्यास महाराष्ट्रासह देशभरातील कांदा उत्पादक शेतकरी तीव्र आंदोलन करतील, असा इशाराही त्यांनी दिला.
गेल्या दोन वर्षांत शेतकऱ्यांना कांदा 700 ते 800 रुपये प्रतिक्विंटल दराने विकावा लागल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे कांद्याला किमान 3 ते 4 हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळावा आणि सरकारने बाजारभावात हस्तक्षेप करू नये, अशी मागणी संघटनेने केली आहे.
नाफेड आणि यांनी खरेदी केलेला कांदा देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी न आणता निर्यात करावा, अशी मागणीही संघटनेने केली. सरकारी कांदा बाजारात आणल्यास आधीच दबावाखाली असलेल्या दरांवर आणखी परिणाम होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होईल, असा दावा संघटनेने केला.
दरम्यान, नाफेडने देशांतर्गत बाजारात कांदा विकण्याचा निर्णय घेतल्यास राज्यभरातील . नाफेडच्या गोदामांसमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे. गरज पडल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला.
कांदा खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता वाढवण्यासाठी यंदा काही बदल करण्यात आले आहेत. नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून सहकारी संस्थांना खरेदीचे टेंडर देण्यात आले असून साठवणुकीची जबाबदारी केंद्रीय गोदाम महामंडळाकडे सोपवण्यात आली आहे. 30 जूनपर्यंत खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन होते; मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने खरेदीची मुदत वाढवण्यात आली आहे.
