मनसेच्या अभिजित पानसे यांनी घेतली संजय राऊत यांची भेट
मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. असं असतानाच दुसरीकडे आज मनसेचे अभिजित पानसे आणि उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली आहे. त्यामुळेच दोन्ही सेना एकत्र येण्यासंदर्भातील हलचालींना सुरुवात झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याचदरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपला नियोजित चिपळूण दौरा अचानक रद्द केल्याचा संदर्भही याच्याशी जोडला जात आहेत.
पानसे आणि राऊत यांच्या भेटीनंतर राऊत हे ‘मातोश्री’ला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळेस पानसे यांना शिवसेना भाजपा युतीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, “असं काही घडणार असेल तर मी नक्की तुम्हाला कळवले. माझी ही वैयक्तिक स्वरुपाची भेट होती. कुठलीही राजकीय चर्चामध्ये झाली नाही. त्यामुळे कोणत्याही राजकीय शक्यता व्यक्त करु नयेत,” असं पानसे यांनी सांगितलं. ठाकरे बंधू एकमेकांना टाळी देणार नाहीत असं समजायचं का? असा प्रश्न पानसे यांना विचारण्यात आला. त्यावर, “याबद्दल बोलण्यासाठी मी फार लहान कार्यकर्ता आहे. यासंदर्भात स्वत: राजसाहेब सांगतील. मात्र सध्या जी परिस्थिती महाराष्ट्रात आहे ती पाहता आमच्या सर्वांचेच म्हणणं आहे की आता महाराष्ट्राने राजसाहेबांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. वेळोवेळी राजसाहेबांनी वेळोवेळी ही भूमिका स्पष्ट केली आहे की मनसे एकटी लढत आली आहे. पुढील निर्णय होईल, न होईल यासंदर्भात सांगायला मी काही ज्योतिषी नाही,” असं पानसे म्हणाले.
“राऊत यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी जात होतो तेव्हा कळलं ते ‘सामना’मध्ये आहेत तर तिथे भेटायला आलो. कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही,” असं पानसे यांनी सांगितलं. “शिवसेना-मनसे एकत्र येण्यासंदर्भातील चर्चा मनसेच्या बैठकीमध्ये झाली नाही. महाराष्ट्रातील मतदारांशी जी थट्टा झाली आहे, त्याबद्दल चर्चा झाली. तसेच हे दोघे एकत्र येणार की नाही याबद्दल बोलायला मी छोटा कार्यकर्ता आहे. असा प्रस्ताव मागच्या वेळेस झाला तेव्हा कटू अनुभव आहे. मात्र पुढे काय होईल याबद्दल मी काही बोलू शकत नाही,” असं पानसे म्हणाले.