भाजप सरकारच्या पुन्हा धमक्या; पुणेकरांवर पुन्हा पाणी टंचाईचे संकट
-माजी आमदार मोहन जोशी
पुणे : पुणेकरांना धरणातून मिळणारे पाणी थांबवू, अशा धमक्या भाजपच्या सरकारने पुन्हा दिलेल्या आहेत, त्याचा आम्ही विरोध करू, असा इशारा माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने पुणे शहराच्या पाणी वापरासाठी ११.६० टीएमसी कोटा मंजूर केला आहे. पुणे महापालिका हद्दीतील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन खडकवासला धरणातून १८ टीएमसी पाणी मिळावे, अशी पुणेकरांची मागणी आहे. त्या मागणीकडे दुर्लक्ष करायचे तसेच जादा पाणी वापराबद्दल ९३३ कोटी रुपये दंड भरा, अशी नोटीस पाठवायची; दंड न भरल्यास १२ दिवसांत पाणी बंद करू अशी धमकी द्यायची, हा प्रकार पुन्हा पुन्हा घडत आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
पुण्यात भाजपचे खासदार मुरलीधर मोहोळ हे केंद्रात मंत्री आहेत. राज्य मंत्रीमंडळात चंद्रकांत पाटील आणि माधुरी मिसाळ यांचा समावेश आहे. १००हून अधिक नगरसेवक भाजपचे आहेत. पुणेकरांनी एवढे पाठबळ देऊनही भाजपचे नेते पुण्याच्या पाण्याचा कोटा वाढवून घेऊ शकलेले नाहीत. निवडणुका लढवायच्या, जिंकायच्या एवढा एककलमी कार्यक्रम भाजपचा चालू आहे, असा आरोप मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे केला आहे. भाजपच्या निष्क्रियतेचा आणि पुणेकरांचे पाणी बंद करू, अशा धमक्या देण्याच्या प्रकाराचा आम्ही निषेध करत आहोत, असेही मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
