Saturday, July 18, 2026
Latest NewsPUNE

डॉ.प्रकाश खापर्डे, प्रा.डॉ.चतुर्भुज भुयान यांना जीवनगौरव पुरस्कार

पुणे :  आयुर्वेद टिचर्स असोसिएशनतर्फे  भारतीय औषध प्रणाली राष्ट्रीय आयोग, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक तसेच एमसीआयएम, मुंबई यांच्या सहयोगाने  ‘आयुर्वेदातील नवी क्षितीजे’   या विषयावर सहाव्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. शनिवार, दि. १७ आॅगस्ट रोजी आॅनलाईन पद्धतीने केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्था संचालक डॉ. रविनारायण आचार्य, डॉ. प्रतिभा शाह आयुर्वेद सल्लागार बोस्टन अमेरिका, टी सुरेश कुमार यांच्यासह इतर आयुर्वेद तज्ञ संबोधित करणार आहेत. तर रविवार, दि. १८ आॅगस्ट  रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत शिवदर्शन येथील राजीव गांधी अ‍ॅॅकॅडमी आॅफ ई-लर्निंग स्कूल येथे ही परिषद होणार आहे.

केंद्रीय आयुष, स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव, सचिव डॉ. राजेश कोटेचा, केंद्रीय समिती अध्यक्ष डॉ. रघुराम भट, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, महाराष्ट्र आयुष संचालक डॉ. रमन घुंग्राळेकर, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक आयुर्वेद अधिष्ठाता डॉ. मिलिंद आवारे या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये यंदाचा जीवनगौरव पुरस्कार उस्मानाबादचे डॉ. प्रकाश खापर्डे आणि ओडिसातील  प्रा.डॉ.चतुर्भुज भुयान यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.राहुल सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला असोसिएशनचे राष्ट्रीय सचिव डॉ. नितीन चांदुरकर, खजिनदार डॉ.नितीन वाघमारे, डॉ. प्रदीपकुमार जोंधळे, डॉ. अपर्णा सोले आदी उपस्थित होते.

दोन्ही पुरस्कारार्थींनी आयुर्वेदाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. डॉ.प्रकाश खापर्डे हे शासकीय आयुर्वेद महाविद्यालय उस्मानाबादचे माजी कुलगुरू होते. तसेच आयुर्वेद रसशाळेत देखील प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून त्यांनी काम केले आहे. अनेक विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले असून त्याबद्दल डॉ. खापर्डे यांना विविध संस्थांनी गौरविले आहे. तर, प्रा.डॉ.चतुर्भुज भुयान  हे मूळचे भुवनेश्वर ओडिसा येथील असून ४६ वर्षांहून अधिक काळ आयुर्वेद विद्यापीठे आणि विविध शैक्षणिक संस्थांमध्ये ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. त्यांची ४३ हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली असून पीएचडी, डि.लीट., एम.फील. च्या हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. या कार्याबद्दल विविध पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

महाराष्ट्र कौन्सिल आॅफ इंडियन मेडिसिन, मुंबई यांच्या मान्यतेने ही परिषद होता आहे. रविवारी सकाळी ११.३० वाजता पुरस्कार वितरण व उद््घाटन सोहळा होणार असून परिषदेत विविध ५०० हून अधिक शोधनिबंध, पोस्टर्स, शोधप्रबंधांचे सादरीकरण देखील होणार आहे. आयुर्वेद शैक्षणिक क्षेत्रामध्ये देशभरात कार्यरत प्राध्यापक, संशोधक, चिकित्सक, औषधे कंपनी यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा सन्मान देखील कार्यक्रमात करण्यात येईल.

‘आयुवेर्दातील नवी क्षितीजे’  या संकल्पनेवर आधारित यंदाची परिषद होणार असून आयुवेर्दाशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता व आयुर्वेद तसेच  वैद्यकीय शास्त्र, विदेशातील आयुर्वेद व संधी, आवाजासाठी आयुर्वेद, युरोलॉजी, विद्धकर्म, आयुर्वेद शास्त्रातील विविध संधी, असाध्य व्याधी व आयुर्वेद  यांसारख्या अनेक विषयांवर भारतभरातील तज्ञ डॉ. सुभाष रानडे, डॉ. रोहित साने, डॉ. चंद्रकुमार देशमुख व इतर आपले विचार मांडणार आहेत. पुण्यासह नवी दिल्ली, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, पंजाब, मध्यप्रदेश, गुजरात, उत्तराखंड, गोवा येथील आयुर्वेद तज्ञ मार्गदर्शन करणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading