सोनम वांगचूक यांच्याशी संवाद साधणे ही भाजपची घटनात्मक जबाबदारी ; राहुल गांधींनी पाठिंबा द्यायला हवा होता – ॲड. प्रकाश आंबेडकर
नवी दिल्ली : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोनम वांगचुक यांची भेट घेतली आणि त्यांना पाठिंबा दिला. वांगचूक याचा आज उपोषणाचा 19 वा दिवस आहे. यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकरांनी ट्विट द्वारे पोस्ट करत म्हटले की, भाजपने त्यांच्याशी तातडीने संवाद सुरू केला पाहिजे. संवाद साधणे ही सरकारची कोणतीही सदिच्छा नाही; ती एक घटनात्मक जबाबदारी आणि नैतिक कर्तव्य आहे.
ॲड. आंबेडकर म्हणाले की, ज्या व्यक्तीला एक नाविन्यपूर्ण संशोधक (इन्व्हेटर), शिक्षण सुधारक आणि हवामान कार्यकर्ता म्हणून केलेल्या कार्यासाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले आहेत, अशा व्यक्तीचा आवाज ऐकण्यासही सरकार नकार देत आहे, असे आपण समजायचे का? जर अशा नागरिकाचे शब्द सत्तेत बसलेल्यांना गैरसोयीचे वाटत असतील, तर यामुळे आपल्या लोकशाहीवर गंभीर प्रश्न निर्माण होतात.
ॲड. आंबेडकरांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भूमिकेवरही बोट ठेवले, ते म्हणाले की, राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी सोनम यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी (एकता दर्शवण्यासाठी) येथे यायला हवे होते. मला माहित आहे की काँग्रेस पक्ष नीट (NEET) पेपर लीक प्रकरणावरून सरकारकडून जाब विचारत आहे, मी स्वतः महाराष्ट्रात हीच लढाई लढत आहे. अशा वेळी, त्यांनी येथे येऊन सोनम यांना पाठिंबा द्यायला हवा होता, जसा मी दिला आहे आणि इतर अनेकांनी दिला आहे.
ज्याप्रमाणे धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून नीट (NEET) पेपर लीक घोटाळ्यासाठी जबाबदार धरले पाहिजे, त्याचप्रमाणे राहुल गांधी यांचीही विरोधी पक्षनेते म्हणून, सत्तेत असलेल्यांविरुद्ध लढणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
