कौशल्य प्रशिक्षणामुळे युवक आत्मनिर्भर बनतील – डॉ. बबन जोगदंड
पुणे : बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात केवळ पदवी मिळवून रोजगार मिळणे कठीण झाले असून, युवकांनी कौशल्याधारित शिक्षण घेऊन स्वतःला सक्षम बनविणे ही काळाची गरज आहे. कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगारासह स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होत असून, त्यातून युवक आत्मनिर्भर बनू शकतात, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)च्या कौशल्य विकास विभागाचे प्रमुख डॉ. बबन जोगदंड यांनी केले.
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त बार्टी आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क (एसटीपी) यांच्या संयुक्त विद्यमाने हडपसर येथील एस. एम. जोशी महाविद्यालय परिसरातील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील इनोव्हेशन फाउंडेशनच्या सी-थ्री-आय (CIII) केंद्रात आयोजित कार्यक्रमात अनुसूचित जातीतील १८० युवक-युवतींना आधुनिक तंत्रज्ञानाधारित प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विविध मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे आयोजन बार्टीच्या महासंचालक दीपा मुधोळ-मुंडे (भा.प्र.से.) आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे महासंचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस. एम. जोशी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एकनाथ एस. मुंढे होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. बबन जोगदंड, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. संजय अहिवळे, बार्टीचे प्रकल्प व्यवस्थापक महेश गवई तसेच लक्ष्मीबाई भाऊराव पाटील इनोव्हेशन फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत कुंदन उपस्थित होते.
डॉ. जोगदंड म्हणाले, “बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात कौशल्य विकास हेच रोजगार आणि आर्थिक स्वावलंबनाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. उद्योगांच्या गरजेनुसार आधुनिक कौशल्ये आत्मसात करणारे युवक भविष्यात अधिक स्पर्धाक्षम ठरतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कौशल्य विकासाची कास धरणे आवश्यक आहे.”
या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील १८० हून अधिक अनुसूचित जातीच्या पात्र युवक-युवतींना उद्योग क्षेत्रातील वाढत्या मागणीचा विचार करून अत्याधुनिक व पूर्णपणे रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये ग्राफिक डिझाइन, सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह, आयटी हेल्प डेस्क असिस्टंट, डेस्कटॉप पब्लिशिंग, ड्रोन सर्व्हिस टेक्निशियन आणि इलेक्ट्रिक वाहन देखभाल तंत्रज्ञ या अभ्यासक्रमांचा समावेश होता. या प्रशिक्षणामुळे डिजिटल अर्थव्यवस्था, माहिती तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिक वाहन उद्योगासारख्या वेगाने विकसित होत असलेल्या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
यावेळी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या सर्व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच प्रशिक्षणानंतर रोजगार मिळविलेल्या आणि स्वयंरोजगारात यशस्वी वाटचाल करणाऱ्या उमेदवारांनी आपल्या प्रेरणादायी यशोगाथा सांगितल्या. त्यांच्या अनुभवांमुळे उपस्थित युवक-युवतींना कौशल्य विकासाच्या माध्यमातून जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याची प्रेरणा मिळाली.
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित हा उपक्रम अनुसूचित जातीच्या युवक-युवतींच्या सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरला. गुणवत्तापूर्ण आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षणामुळे त्यांच्या रोजगारक्षमतेत लक्षणीय वाढ होण्यास मदत झाली असून, आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात स्पर्धात्मक संधी उपलब्ध झाल्या आहेत.
विशेषतः ड्रोन तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक वाहन देखभाल, डिजिटल डिझाइन, सोशल मीडिया व्यवस्थापन आणि आयटी सेवा यांसारख्या भविष्योन्मुख क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण मिळाल्यामुळे अनुसूचित जातीतील युवकांना पारंपरिक रोजगाराच्या चौकटीबाहेर जाऊन अधिक उत्पन्नाच्या आणि कौशल्याधारित करिअरच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या प्रशिक्षणामुळे केवळ रोजगारच नव्हे, तर स्वयंरोजगार, स्टार्टअप आणि उद्योजकतेलाही चालना मिळणार आहे.
बार्टीच्या या उपक्रमामुळे संविधानाने अपेक्षित सामाजिक न्याय, समान संधी आणि आर्थिक समावेशनाच्या उद्दिष्टांना बळकटी मिळत असून, कौशल्याधारित विकासाच्या माध्यमातून अनुसूचित जातीच्या युवकांना आत्मनिर्भर, स्पर्धाक्षम आणि तंत्रज्ञानस्नेही नागरिक म्हणून घडविण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा ठरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे व्यवस्थापक वैभव निमगिरे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील इनोव्हेशन फाउंडेशनचे व्यवस्थापक आशिष कळस आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे प्रशिक्षण समन्वयक डॉ. मनोज कुलकर्णी यांच्या संयोजन समितीने केले.
