गणेशोत्सव दरम्यान लोकायतचे प्रबोधनात्मक उपक्रम
पुणे: सार्वजनिक गणेशोत्सवा दरम्यान भाऊसाहेब रंगारी व लोकमान्य टिळकांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले. हाच वारसा चालविण्याची जबाबदारी आपल्या पिढीची आहे. त्यामुळेच दरवर्षी लोकायत संघटना गणोशोत्सव दरम्यान विविध मंडळात प्रबोधनात्मक व सामजिक उपक्रम राबवत असतो असं लोकायतच्या समन्वयिका ॲड. मोनाली अर्पणा यांनी सांगितले.
पोवाडा, अभंग, रिंगण, सडक नाटक, पोस्टर प्रर्दशन सारखे विविध सांस्कृतिक कार्यक्रम गणेश मंडळात करण्यात आले हे कार्यक्रम कोथरूड ,पर्वती, शिवाजी नगर भागातील विविध मंडळात करण्यात आले. रयतेचं कल्याणकारी राज्य उभं करणाऱ्या शिवबांच्या जीवनातील मौल्यवान पैलू — आया बहिणींचा राजा, धर्मनिरपेक्ष राजा, शेतकऱ्यांची आई सारखी काळजी घेणारा राजा पोवाड्याच्या मार्फत सादर करण्यात आली. यासोबतच संतविचारांच्या प्रसारासाठी अभंगांसोबत विठुनामाच्या गजरात पावलीही घेतली. भारतीय संविधानातील सामाजिक न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि धर्मनिरपेक्षता ह्या मूल्यांची पाळेमुळे संत विचारांमध्ये सापडतात याबाबतचे पत्रकही देण्यात आले. तसेच वाढत्या महागाईच्या कारण सांगणारा चौपट राजा, जनतेचा बाजा हे पथनाट्यही केले. पोस्टर प्रर्दशनाद्वारे स्वातंत्र्यलढ्यामध्ये सर्व जाती-धर्माच्या, सुशिक्षित, अशिक्षित, अतिश्रीमंत, गरिब अशा अनेक प्रकारच्या स्त्रियांनी केलेल्या कामगिरीची माहिती देण्यात आली. नाना पेठेतील साखळीपीर राष्ट्रीय मारुती मंदिर येथील गणेश मंडपात चंद्रयान देखाव्यासोबत सोशल मीडियाचे होणारे सामाजिक व शारीरिक परिणाम बाबत स्टॉलही लावण्यात आले.सर्व उपक्रमांना उपस्थितांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
