मराठा आरक्षण : जरांगेंच उपोषण मागे; पण लढा चालूच ठेवण्याचा निर्धार
जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आज सतराव्या दिवशी आपलं उपोषण मागे घेतले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ज्यूस पीऊन त्यांनी आपले उपोषण सोडले. मात्र, मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला.
मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यसरकारला महिनाभराचा वेळ दिला आहे. मात्र, उपोषण सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनीच आले पाहिजे, अशी त्यांची अट घातली होती. त्यांच्या इच्छे नुसार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सराटी (जालना) येथे उपोषण स्थळी जावून जारांगेंना उपोषण मागे घेण्याची विनंती केली.
यावेळी जरांगे म्हणाले, मराठा आरक्षण हा आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. अन् मराठा समाजाला फक्त एकनाथ शिंदेच न्याय देऊ शकतात. राज्यातील मराठा समाजाला एकनाथ शिंदे यांच्या कडून खूप आशा आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजासह इतर निर्णय धाडसाने घेतले आहेत. त्यामुळे पुढील काळातही ते आरक्षणाचा मुद्दा लावून धारतील अशी मला आशा आहे. आज उपोषण मागे घेतले आहे. मात्र आता मी भारावून न जाता आरक्षण प्रश्नासाठी शिंदे साहेबांच्या मागेच लागणार आहे. इथून पुढच्या काळात आरक्षण दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. शिंदे साहेब येणार म्हटले, आणि मी ही त्यांना आणून दाखवले. मी आरक्षणाबाबत मागे हटणार नाही शिंदे साहेबांना हटू देणार नाही.
