जय भवानी मित्र मंडळातर्फे ६४० गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप
पुणे : श्री वेताळ बाबा मंदिर ट्रस्ट, जय भवानी मित्र मंडळ, जय भवानी नगर, जनता वसाहत यांच्या वतीने परिसरातील गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्यावाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ६४० गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना वह्यांचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे, गेल्या २५ वर्षांपासून मंडळामार्फत हा सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे.
कार्यक्रमास पुण्याचे माजी उपमहापौर नगरसेवक प्रसन्न जगताप हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मित्रपरिवारातील कार्यकर्ते आकाश शेंडकर, रोहन बंगाल, हेमंत भाटी, अमोल हुंबरे, सोमनाथ सूर्यवंशी, आनंद भाटी, निवास गाडेकर, आकाश चव्हाण, नकुल बोंबले आदींनी परिश्रम घेतले.
यावेळी माजी उपमहापौर नगरसेवक प्रसन्न जगताप म्हणाले, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. जय भवानी मित्र मंडळ गेली अनेक वर्षे गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत असून, हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी आहे.
कार्यक्रम संयोजक किशोर ठाकूर म्हणाले, शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये, या उद्देशाने मंडळाच्या वतीने गेल्या २५ वर्षांपासून वह्यावाटप उपक्रम राबविला जात आहे. भविष्यातही सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
