गुवाहाटी सोडा; इंडिया आघाडीच्या बैठकीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च – उदय सामंत
मुंबई : मुंबईत होत असलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असल्याचा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. आज आणि उद्या मुंबईत इंडिया आघाडीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीच्या खर्चाचे आकडे मंत्री उदय सामंत यांनी मीडिया समोर मांडले.
यावेळी बोलताना उदय सामंत म्हणाले, 45 हजारांच्या 65 खुर्च्या या बैठकीसाठी मागवण्यात आल्या आहेत. चौदा ते पंधरा तासांच्या बैठकीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. जेव्हा आम्ही गुवाहाटीला गेलो होतो तेव्हा आमच्या हॉटेलचा खर्च काढण्यात येत होता. ग्रॅण्ड हयातमधील एका खोलीचा दर हा 25 ते 30 हजार रुपये इतका आहे. तर जेवणाचे एक प्लेटही साडेचार हजार रुपयांची असल्याचा धक्कादायक दावा उदय सामंतांनी केला आहे. त्यामुळे जे 14 तासांसाठी 65 हजार रुपयांचा खर्च करतात त्यांना आमच्यावर बोलण्याचा अधिकार नसल्याचं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
इंडिया आघाडीवर निशाणा साधताना उदय सामंत यांनी म्हटलं आहे की, “मुंबईत असंतुष्टांचा मेळावा भरतोय. देशाचं नाव राजकारणासाठी वापरणं हे दुर्दैवी आहे.” लोकसभा निवडणुका झाल्यावर इंडिया संपुष्टात येणार असल्याचं वक्तव्य देखील उदय सामंत यांनी केलं आहे. ज्यांनी बाळासाहेबांवर टीका केली त्यातील अनेक पक्षांचा समावेश या इंडियाच्या आघाडीमध्ये आहे, असं उदय सामंत म्हणाले आहेत.
दरम्यान, जी यादी हॉटेलकडे गेली आहे त्यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हा पक्ष 26 व्या स्थानावर आहे. तर शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष 25 व्या स्थानी आहे.” त्यामुळे महाराष्ट्रातील दोन महत्त्वाचे पक्ष हे शेवटून दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असल्याचं यावेळी उदय सामंत यांनी सांगितले.
