जवानांच्या पोलादी मनगटांवर भारतमातेच्या जयघोषात बांधल्या राख्या
पुणे : चाकावरच्या खुर्चीवरचे आयुष्य जगणारे ते सैनिक, देशभक्तीचा जोश मात्र कायमच जागवणारे…अशा जवानांच्या पोलादी मनगटांवर भारतमातेच्या जयघोषात भगिनींनी रेशीमराख्या बांधल्या. खडकीच्या अपंग सैनिक पुनर्वसन केंद्रात हे भारलेले आणि राष्ट्रभक्तीने गुंफलेले वातावरण पहायला मिळाले.
सैनिक मित्र परिवाराच्या वतीने खडकी येथील पॅराप्लेजिक सेंटर येथे जवानांसोबत राखीपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी कर्नल आर.के. मुखर्जी, कर्नल बी.एल. भार्गव आणि इतर अधिकारी, सैनिक मित्र परिवाराचे आनंद सराफ, तसेच स्वाती पंडीत, आरती भिसे, निकीता गुजराथी, सुरेखा होले, प्रितम गांधी, सिमरन गुजराथी, चंदूकाका सराफ पेढीच्या वैष्णवी ताम्हाणे, रुचिता गुप्ता उपस्थित होते.
आनंद सराफ म्हणाले, कृतज्ञता ही भारतीय संस्कृतीचे द्योतक आहे. सणावारांच्या निमित्ताने देशवासियांना सीमारक्षकांप्रती आत्मीयता व्यक्त करण्याची संधी लाभत असते. १९९७ पासून सैनिकांसोबत राखीपौर्णिमेचे आयोजन करण्यात येते. या भावबंधन सोहळ्यात शाळा महाविद्यालयीन विद्यार्थिनी, महिला मंडळे, वीर नारी,माजी सैनिक, चंदूकाका सराफ पेढीच्या कर्मचारी, युवा स्पंदन संस्था अशा अनेकांचा सहभाग लाभला