Wednesday, June 10, 2026
Latest NewsPUNE

केवळ उत्सवात नव्हे वर्षभर गणपती मनात रहायला हवा -आमदार अश्विनी जगताप

पुणे : लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला गणेशोत्सव महाराष्ट्रात मोठया उत्साहात साजरा केला जातो. गणेशोत्सव मंडळांनी हा उत्सव पुढे नेला आहे. केवळ सजावटीवर खर्च न करता गणेशोत्सवात सामाजिक उपक्रम देखील राबविले जात आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट केवळ उत्सवात नाही, तर वर्षभर सातत्याने सामाजिक कार्य करीत आहे. त्यामुळे अशा प्रकारचे सामाजिक काम करीत केवळ उत्सवातच नव्हे, तर वर्षभर प्रत्येक मंडळ व कार्यकर्यांच्या मनात सामाजिक कार्याच्या माध्यमातून गणपती रहायला हवा, असे मत आमदार अश्विनी जगताप यांनी व्यक्त केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा पिंपरी-चिंचवड विभागाचा पारितोषिक वितरण सोहळा प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात पार पडला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनिल रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, मंगेश सूर्यवंशी, राजाभाऊ पायमोडे, सौरभ रायकर, सचिन आखाडे, तुषार रायकर, ज्ञानेश्वर रासने, स्पर्धेचे परीक्षक बापूसाहेब ढमाले, माजी उपमहापौर कैलास भांबुर्डेकर, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, संतोष ढोरे आदी उपस्थित होते.

अश्विनी जगताप म्हणाल्या, गणेशोत्सवात पारंपरिक वाद्यांचे वादन योग्य आहे. यामुळे आपल्या स्फूर्ती आणि उर्जा निर्माण होते. स्पिकर्सच्या भिंतींचा सर्वांवरच विपरीत परिणाम होतो. उत्सवात प्रत्येकाने कायदा व सुव्यवस्थेचे पालन करायला हवे, तसेच पोलिसांना देखील सहकार्य करावे. तसेच विसर्जन मिरवणूक वेळेत संपविण्याकरीता देखील मंडळांनी प्रयत्न करायला हवे.

हेमंत रासने म्हणाले, पिंपरी-चिंचवड परिसरात मागील ३२ वर्षांपासून ही स्पर्धा सुरु आहे. गणेशोत्सवाला विधायक व रचनात्मक वळण लागावे, हा यामागील उद्देश आहे. गणेशोत्सवात हजारो कार्यकर्ते तयार होऊन त्यांचा उपयोग समाज व देशाकरिता व्हायला हवा. गणेशोत्सवातूनच राज्यातील नेतृत्व निर्माण झाले आहे. आता कार्यकर्त्यांनी देशाचे देखील नेतृत्व करावे. जगाच्या नकाशावर हा उत्सव अधिकाधिक चांगला पद्धतीने न्यायला हवा, असेही त्यांनी सांगितले.

महेश सूर्यवंशी म्हणाले, सातत्याने पहिल्या पाच क्रमांकात येणा-या पठारे लांडगे तालीम व्यायाम मंडळ भोसरी, जय बजरंग तरुण मंडळ निगडी गावठाण, जयहिंद मित्र मंडळ निगडी प्राधिकरण, एस.के.एफ मित्र मंडळ चिंचवड, गांधी पेठ तालीम मित्र मंडळ चिंचवड आणि लांडगे लिंबाची तालीम मित्र मंडळ भोसरी या मंडळांना जय गणेश भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. दरवर्षी या मंडळांच्या कार्याचा गौरव ट्रस्टतर्फे करण्यात येणार आहे. यापुढे ही मंडळे प्रत्यक्ष स्पर्धेत सहभागी होणार नाहीत, यामुळे नव्या मंडळांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळेल.

स्पर्धेत थेरगाव येथील जय महाराष्ट्र मित्र मंडळाने प्रथम, रुपीनगरमधील दक्षता तरुण मंडळाने द्वितीय, चिंचवडगावातील चिंतामणी मित्र मंडळाला तृतीय, काळेवाडीतील आझाद मित्र मांडला स्पोर्ट क्लबला चौथा क्रमांक आणि भोसरीतील श्रीराम मित्र मंडळाला पाचवा क्रमांक मिळाला आहे. स्पर्धेत १९६ मंडळे सहभागी झाली होती. त्यातील ९० मंडळांनी पारितोषिके मिळविली असून एकूण १४ लाख ८२ हजार रुपयांची पारितोषिके देण्यात आली. महेश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading