Monday, August 31, 2026
Latest NewsPUNE

आचार्य अत्रे यांचे स्मारक मुंबईत उभारावे

 पुणे : संयुक्‍त महाराष्ट्र आणि मराठी भाषेकरीता  आचार्य अत्रे यांनी आपल्या शेवटच्या श्‍वासापर्यंत काम केले. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा कुटील डावदेखील ?त्यांनी हाणून पाडला.  प्रतिभावंत, बहुआयामी आणि निर्भिड आचार्य अत्रे यांचे विचार, साहित्य पुढील पिढीपर्यंत पोहचले पाहिजे, असे मत ज्येष्ठ कलाकार श्रीधर व्यंकटेश उर्फ बाबुराव कानडे यांनी व्यक्‍त केली. आचार्य अत्रे यांच्या योगदानामुळे मुंबई महाराष्ट्रात आहे. त्याच मुंबईत त्यांचे स्मारक राज्य शासनाने उभारावे अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
संवाद, पुणे व कोहिनूर ग्रुप यांच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजित ज्येष्ठ साहित्यिक प्र. के. अत्रे यांच्या 125 व्या जन्मशताब्दीचा प्रारंभ रविवारी करण्यात आला. या निमित्ताने गेल्या 50 हून अधिक काळ आचार्य अत्रे यांच्या स्मृती जतन करणार्‍या आणि जिवंत ठेवणार्‍या श्रीधर व्यंकटेश उर्फ बाबुराव कानडे यांचा ‘प्र. के. अत्रे कोहिनूररत्न पुरस्कार’ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख व खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला. सन्मापत्र, पुणेरी पगडी, शाला व पुष्पगुच्छ देण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल उपस्थित होते. ‘संवाद’चे सुनील महाजन, निकिता मोघे, विजय कोलेते, पंडित वसंतराव गाडगीळ उपस्थित होते.
आज झालेला सत्कार हा माझा नसून आचार्य अत्रे यांचा आहे. माझ्या 50 वर्षाची दखल पुणेकरांनी घेतली, यांचा आनंद आहे, अशा भावाना कानडे यांनी व्यक्‍त केल्या. ते पुढे म्हणाले, अत्रे यांनी महाराष्ट्राला हसवायला शिकविले. त्यांनी केलेला मराठी भाषेचा जागर वर्षभर विविध उपक्रमाने त्यांच्या साहित्य, विचारांची महाराष्ट्रभर जनजागृती करणार आहे. मुंबईत आचार्य अत्रे यांचे स्मारक होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कानडे यांनी सांगितले.
डॉ. लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, संयुक्‍त महाराष्ट्राच्या चळवळीत अत्रे यांचे मोठे योगदान आहे. कर्नाटकातील बेळगाव, कारवार मधील मराठी भाषा टिकविण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे. अत्रे यांनी प्रत्येक टप्प्यात विविध कामे केली. आदर्श शिक्षक, पत्रकार, लेखक अशा बहुआयामी निर्भिड व्यक्‍तीमत्व महाराष्ट्राला मिळाले. स्त्रीमुक्‍तीसाठीदेखील त्यांनी कामे केली.  सीमा भाषिकांसाठी, मराठीसाठी, तसेच मराठी कायदा करण्याठी आपण चळवळ उभी केली पाहिजे.
श्रीनिवास पाटील म्हणाले, आचार्य अत्रे यांना जवळून पाहण्याचा योग मला आला. मराठी माणसाठी अवघे जीवन त्यांनी वाहून दिले होते. त्यांचे कार्य विचार आपण पुढे नेला पाहिले. अत्रे यांची स्मृती जपण्यासाठी अत्रे यांचे साहित्यांचा अभ्यास करायला हवा.
कृष्णकुमार गोयल म्हणाले, पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे, या राजधानीत महाराष्ट्रासाठी योगदान देणारे व्यक्‍तीमत्वांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करणार्‍यांचा  सन्मान झाला पाहिजे. गेल्या अनेक  वर्षांपासून  ‘संवाद’च्या  वतीने महाराष्ट्राती नामवंत साहित्यिक, कलाकार लेखकांच्या जन्मशताब्दिनिमित्त उपक्रम राबवून विचार पोहचवित आहे. अत्रे यांचे विचार पोहचविण्यासाठी काम हाती घेण्याची गरज आहे. सुनिल महाजन प्रस्ताविकात म्हणाले, गेली 30 ते 40 वर्षांपासून सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येत आहे. कलाकार, लेखक, साहित्यिक कार्याचा विचार आम्ही उपक्रमातून पोहचवितो. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. विनिता आपटे यांनी केले. तर निकिता मोघे यांनी आभार मानले. कार्यक्रमानंतर आचार्य अत्रे यांच्या साहित्यावर आधारित ‘बहुआयामी अत्रे’  दृकश्राव्य कार्यक्रम डॉ. विनिता आपटे व वारजे शाखेच्या मसापच्या अध्यक्षा माधुरी वैद्य यांनी सादर केला. यामध्ये अत्रे यांचे नाटकांतील प्रवेश, गाणी, कविता, नाटके व चित्रपटातील विविध विनोदी किस्से  सांगून त्यांनी आचार्च अत्रे यांनी उलगडे. त्यांच्या जीवनाचे विविध टप्पे, किस्से, विनोद सांगून अत्रे यांचा काळ कार्यक्रमातून उलगडण्यात आला. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading