शिंदे गटातील नाराज 7 ते 8 आमदार ‘मातोश्री’ च्या संपर्कात – खासदार विनायक राऊत
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेतील ७ ते ८ आमदारांनी स्वगृही परतण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधल्याचा दावा खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. शिंदे गटातील २ आमदारांत मुंबईत झटापट झाल्याचे वृत्त आहे. त्यानंतर लगेच विनायक राऊत यांनी हा दावा केल्यामुळे राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप होण्याचा दावा केला जात आहे.
अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. या वादाची धूळ खाली बसत नाही, तोच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे अनेक आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. अजित पवार व त्यांच्या समर्थकांच्या सरकारमधील शिंदे गटातील अनेक नेते नाराज आहेत. त्यापैकी ७ ते ८आमदारांनी थेट उद्धव ठाकरेंशी संपर्क साधून स्वगृही परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार नाहीत. कुणीही दिवास्वप्नं पाहू नयेत, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी शिवसेनेची महत्त्वाची बैठक झाली, या बैठकीनंतर त्यांनी हा दावा केला. राष्ट्रवादीच्या सहभागामुळे शिवसेनेत कुणीही नाराज नाही, असे सांगतानाच लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि शिंदेंच्याच नेतृत्वात आगामी निवडणुका लढवल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
