Monday, May 25, 2026
Latest NewsPUNE

कन्नड संघ आणि कर्नाटक यांचे सांस्कृतिक योगदान लक्षणीय; ज्येष्ठ उद्योगपती डॉ. अभय फिरोदिया यांचे गौरवोद्गार

पुणे : कर्नाटक राज्य आणि पुण्यातील कन्नड संघ यांचे देशाच्या सांस्कृतिक क्षेत्रात लक्षणीय योगदान आहे. गायन, वादन, नृत्य, साहित्य, तत्त्वज्ञान आणि मंदिर स्थापत्यासह समाजसेवेचे क्षेत्रही कन्नड मंडळींनी आपलेसे केले आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ उद्योगपती डॉ. अभय फिरोदिया यांनी शनिवारी येथे काढले.

सुहाना बसंत फाउंडेशन आणि कन्नड संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सितार नवाज उस्ताद बाले खान संगीत महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. एरंडवणे येथील गणेशनगरमध्ये डॉ कलमाडी  हायस्कूलच्या शकुंतला शेट्टी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात यावर्षी संगीत नाटक अकादमी पुरस्कारप्राप्त कलाकारांचा विशेष सन्मान करण्यात आला. याप्रसंगी डॉ. फिरोदिया बोलत होते.

यावेळी उस्ताद उस्मान खान (सतार), पं विनायक तोरवी (गायन), पं रवींद्र यावगल (तबला), विदुषी आरती अंकलीकर टिकेकर (गायन) यांचा डॉ फिरोदिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कन्नड संघाच्या  सचिव मालती कलमाडी, आयोजक रईस बाले खान, रफिक खान आदी यावेळी उपस्थित होते.
सत्काराविषयी कृतज्ञता व्यक्त करून उस्ताद उस्मान खाॅं म्हणाले,’कन्नड संघ आणि बाले खान कुटुंब यांचे घनिष्ठ नाते आहे. धारवाड येथे आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केले आहे. पुण्यात कन्नड संघ तीच सांस्कृतिक परंपरा पुढे नेत आहे. त्यामुळे संघाने केलेला सत्कार विशेष आहे,’.
पं. विनायक तोरवी यांनी कन्नड संघ, धारवाड आणि कलापरंपरा यांची माहिती दिली. ‘धारवाडच्या घराघरात कला आहे. ज्येष्ठ कनिष्ठ असा कुठलाही फरक न करता इथे कलासाधना केली जाते. तिथल्या मातीचाच हा गुणधर्म आहे. कला आणि संस्कृतीचे पूजन तेथे केले जाते. रईस बाले खान आणि कन्नड संघ हीच परंपरा चालवीत आहेत. त्यांनी केलेला सत्कार मला अधिक आनंददायी आहे,’.
आरती अंकलीकर यांनी अभिजात संगीतात असलेल्या साधकाला बांधून ठेवणार्या ताकदीचा उल्लेख केला. कितीही अडचणी, संघर्ष असला तरी संगीत स्वस्थ बसू देत नाही. संगीत कलाच साधकांना शक्ती, ऊर्जा देते, असे त्या म्हणाल्या.

अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांची उपस्थिती
सत्कार सोहळा सुरू असताना अचानक सभागृहात प्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना मीनाक्षी शेषाद्री यांचे आगमन झाले. त्यांचेही स्वागत कन्नड संघाच्या सचिव मालती कलमाडी यांनी केले. ‘मी २७ वर्षांनंतर पुन्हा भारतात परतले आहे आणि आता पुणेकर झाले आहे. कला, संस्कृतीचे विश्व पुन्हा खुणावते आहे, असे त्या म्हणाल्या.

प्रस्तुत महोत्सवाची सुरवात  प्रसिद्ध सुंद्रीवादक भीमण्णा जाधव यांच्या सुंद्रीवादनाने झाली. भीमण्णा जाधव हे सुंद्रीसम्राट सिद्राम जाधव यांचे नातू व पंडित चिदानंद जाधव यांचे सुपुत्र आहेत.  भीमण्णा जाधव यांचे सुपुत्र व्यंकटेश कुमार यांनी सहवादन केले. त्यांना डॉ अतुल कांबळे यांनी तबल्यावर साथ केली. अनघा परांजपे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading