देशातील एकात्मता टिकून राहण्यात संत साहित्याचा मोठा वाटा : डॉ. सदानंद मोरे
पुणे : संतसाहित्य आणि संतांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार हा मुख्यत्वे दिंडीच्या माध्यमातून देशाच्या विविध भागात झाला आहे. दिंडीची परंपरा आजही अव्याहतपणे सुरू असून देशात एकात्मता टिकून राहण्यात संत साहित्याचा मोठा वाटा आहे, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी केले. आझादी का अमृत महोत्सवाअंतर्गत केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वितस्था (काश्मीर) महोत्सवाअंतर्गत दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, संस्कृती मंत्रालय, साहित्य अकादमी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहयोगाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शनिवारपासून वितस्था का विस्तार : काश्मीर महोत्सवाअंतर्गत ‘गोदावरी और वितस्था : एक सांस्कृतिक यात्रा‘ या विषयी चर्चासत्रे, परिसंवादांचे आयोजन करण्यात आले होते. ‘संत साहित्य का प्रसार और प्रभाव‘ या विषयावरील परिसंवादात डॉ. मोरे अध्यक्षपदावरून बोलत होते. डॉ. मोरे म्हणाले, पूर्वीच्या काळात कीर्तन, प्रवचन हे समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम होते. दिंडीतही असंख्य भाविक सहभागी होत असत. या दिंड्या ठिकठिकाणी प्रवास करीत असत. त्याद्वारे संत साहित्याचा प्रसार होण्यास बळ मिळत असे आणि ही परंपरा आजही टिकून आहे. दृकश्राव्य माध्यमातून विषयाची मांडणी करताना साहित्यिक विद्याधर पाटंगणकर म्हणाले, साहित्य आणि संस्कृती यामध्ये अतूट नाते आहे. मानवतावादाचा विचार लोकभाषेतून पुढे आला आहे. मराठी मन व मराठी साहित्य याचा जवळचा संबंध आहे. तो आजही विकसित होत आहे. ‘कश्मीर की ऋषिसूफी परंपरा की समावेशी संस्कृति‘ या विषयी मुश्ताक बर्क तर नाट्यशास्त्र आणि लडीशाह याविषयी भाषा सुंबली यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सुंबली यांनी नाट्यशास्त्राचा आजवरचा प्रवास आणि नवरसाचे सुरेख सादरीकरण अभिनयाच्या माध्यमातून वाद्यासहित केले. त्यास उपस्थितांची दाद मिळाली. ‘संत साहित्य की समन्वय धारा‘ याविषयावर झालेल्या चर्चासत्रात बोलताना मराठी संत साहित्याचे अभ्यासक आणि चर्चासत्राचे अध्यक्ष दिलीप धोंगडे म्हणाले की, देशाला संत साहित्याची मोठी परंपरा आहे. ही परंपरा पुढे नेण्याचे आणि टिकवून ठेवण्याचे कसोशिने प्रयत्न होत आहेत. संतसाहित्याचा समाजमनावर मोठा प्रभाव आहे. या साहित्यात सर्व सामान्यांच्या भावनांचे प्रतिबिंब दिसते. ‘वितस्था का पूर्व इतिहास और महत्त्व‘ या विषयी सतीश विमल यांनी सादरीकरण करीत विषयाची प्रभावीपणे मांडणी केली. शशि शेखर तोशखानी यांनी ‘भारतीय साहित्य के कश्मिरी आचार्य‘ या विषयावर दृक–श्राव्य माध्यमातून माहिती दिली. ‘प्राचीन कश्मीर का निर्माण‘ या विषयावर डॉ. शोनालिका कौल यांनी व्याख्यानातून प्राचीन काश्मीरबाबत माहिती दिली. ‘मिले सूर मेरा तुम्हारा‘ या कार्यक्रमाद्वारे अर्चना हेगडेकर आणि मेघ कल्याण सुंदरम यांनी मराठी आणि काश्मिरी भाषेतील गीते सादर केली. ‘तुज मागतो मी आता‘ मराठी गीताने हेगडेकर यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर काश्मिरी भाषेतील काही लोकगीते कलाकारद्वयींनी सादर केली. काश्मीरमध्ये चित्रीत झालेली हिंदी चित्रपट गीते पडद्यावर दिसत असताना अर्चना हेगडेकर आणि मेघ कल्याण सुंदरम यांनी रसिकांसमोर गीते सादर केली. या अनोख्या सादरीकरणाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. दोन दिवसीय चर्चासत्राचा समारोप प्रख्यात काश्मिरी विद्वान काशिनाथ पंडिता आणि प्रख्यात हिंदी–काश्मिरी लेखक अग्निशेखर यांच्या उपस्थितीत झाला. काशिनाथ पंडिता म्हणाले, चर्चासत्रादरम्यान अनेक अभ्यासकांनी विविध विषयांवर अभ्यासपूर्ण शोधनिबंध सादर केले आहेत. या व्यासपीठावरून काश्मीर आणि वितस्था या संदर्भात व्यापक चर्चा झाली असून ही चर्चा अभ्यासकांना निश्चितच उपयुक्त ठरेल. अग्निशेखर यांनीही मनोगत व्यक्त केले.
Read More