ॲड. सदावर्ते यांची मनोज जरांगे यांच्या विरोधात तक्रार
कठोर कायदेशीर कारवाईची केली मागणी
मुंबई: प्रतिनिधी
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनात राज्य सरकारने घातलेल्या अटी आणि शर्तींचा भंग होत असून त्यामुळे नागरिकांना उपद्रव होत असल्याची ऑनलाइन तक्रार ॲड गुणवंत सदावर्ते यांनी केली आहे. त्याबद्दल कठोर कायदेशीर कारवाईची मागणी ही त्यांनी केली आहे.
जरांगे पाटील यांना राज्य सरकारने केवळ एक दिवस सकाळी नऊ ते सहा या वेळेत पाच हजार समर्थकांसह आंदोलन करण्यास अनेक अटी शर्ती घालून परवानगी दिली आहे. मात्र, आंदोलकांकडून या अटी आणि शर्तींचे उल्लंघन होत असल्याचा ॲड सदावर्ते यांचा आरोप आहे.
आंदोलनस्थळी घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक संख्येने जरांगे समर्थक उपस्थित असल्याचा दावा ॲड सदावर्ते यांनी केला आहे. त्याचप्रमाणे सनदशीर मार्गाने आंदोलन न करता काही आंदोलकांनी मुंबईतील रस्त्यांवर रस्ते अडवण्याचा, रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे, असाही त्यांचा दावा आहे.
या नियमभंगामुळे जरांगे आणि त्यांच्या समर्थकांवर भारतीय न्याय संहितेअंतर्गत तसेच मुंबई पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ॲड सदावर्ते यांनी केली आहे. त्यांच्या या तक्रारीवर पोलीस आणि प्रशासन काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
