त्या दोघांना पोलीस किंवा निवडणूक आयोगाकडे नेण्याऐवजी राहुल गांधी यांच्याकडे का घेऊन गेलात? वंचित बहुजन आघाडीचा सवाल
मुंबई: प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना दोन जण भेटल्यावर निवडणुकीत मतदानाच्या फेरफाराची शक्यता लक्षात आल्यावर त्या दोघांना पोलीस किंवा निवडणूक आयोगाकडे नेण्याऐवजी लोकसभा. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडे का घेऊन गेलात; असा. कळीचा सवाल वंचित बहुजन आघाडीने केला आहे.
पवारांच्या या दाव्यानंतर सत्ताधारी पक्षांसह वंचित बहुजन आघाडीनेही त्यांना धारेवर धरले आहे. समाज माध्यमांवर आघाडीने पवार यांना पाच सवाल केले आहेत.
१. तुम्ही पोलिसांकडे किंवा निवडणूक आयोगाकडे तक्रार का केली नाही? तुम्ही या दोघांविरुद्ध तक्रार केली नाही पण, तुम्ही त्यांना राहुल गांधींकडे निवडणूक हेराफेरीचा सौदा करण्यासाठी घेऊन गेलात.
२. जर तुम्हाला त्या दोघांची नावं आणि पत्ता माहीत नसेल, तर जेव्हा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या घरात प्रवेश हा त्यांची नावे न लिहिताच झाला असेल! त्यांची नावे प्रवेश करतांना नोंदणीतून उघड होऊ शकतात.
३. तुमचे हेतू स्पष्ट नव्हते, म्हणूनच तुम्ही त्यांना राहुल गांधींकडे घेऊन गेलात. तुम्हाला माहित होते की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हेराफेरी होऊ शकते. मग तुम्ही गप्प का होता? कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही इतके दिवस गप्प राहिलात?
४. राहुल गांधींनी तुम्ही ज्या गोष्टी सांगत आहात याची पुष्टी करावी.
५. राहुल गांधी वरील सर्व प्रश्नांची पुष्टी करतील का?
असे सवाल आघाडीने पवार यांना केले आहेत. या प्रश्नाची उत्तरे नाही दिली तरी त्यांच्या विधानाच्या हेतू आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहू शकते आणि पवार अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे या प्रश्नांचे पवार काय स्पष्टीकरण देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
