दुर्दैवी: छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा केवळ आठ महिन्यात कोसळला
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकोट किल्ल्यात उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा केवळ आठ महिन्यात कोसळला आहे. मालवणजवळ असलेल्या तारकर्लीच्या राजकोट किल्ल्यात भारतात पहिले आरमार उभारणारे दृष्टे राज्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा ३५ फुटी पुतळा उभारण्यात आला होता. आरमार दिनाचे औचित्य साधून ४ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण करण्यासाठी…
केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात यावे, या अट्टाहासाने कोट्यावधी रुपये खर्च करून उभारलेल्या या पुतळ्याचे काम घाई घाईने दर्जाकडे लक्ष न देता उरकण्यात आले. त्यामुळेच चारशे वर्षानंतरही एक वीट न ढासळलेल्या या किल्ल्यातील सहा महिन्यापूर्वी उभारलेला पुतळा ढासळाला आहे, असा आरोप स्थानिक आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.
राज्यभर आंदोलनाचा इशारा
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे काम घाईने आणि दर्जा न सांभाळता केले जात असल्याचे आक्षेप स्थानिक नागरिकांनी काम सुरू असतानाच घेतले होते. मात्र, या आक्षेपांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. इतकेच नव्हे तर ही जाणीव करून देणाऱ्यांना आपले विरोधक असल्यासारखे वागवण्यात आले. या प्रकाराला जबाबदार असणाऱ्यांवर त्वरित कारवाई न झाल्यास केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर आंदोलन केले जाईल, असा इशारा नाईक यांनी दिला आहे. तसेच शिवप्रेमींनी हे आंदोलन शांततेत पार पाडावे, असे आवाहनही केले आहे.
