कै.धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता पुरस्काराची घोषणा
सामाजिक कार्यकर्ते अशोक देशमाने, शास्त्रीय गायक पं.रघुनंदन पणशीकर, सामाजिक कार्यकर्ते जुगल राठी यांना पुरस्कार जाहीर
पुणे – राजकीय, सामाजिक आणि कला क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारे कै.धनंजय थोरात स्मृती प्रतिष्ठानचे यंदाचे कै.धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक देशमाने, ज्येष्ठ शास्त्रीय गायक रघुनंदन पणशीकर आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जुगल राठी यांना जाहीर झाले आहेत.
कै.धनंजय थोरात यांच्या १७व्या स्मृतीदिनानिमित्त या पुरस्कारांची घोषणा आज (सोमवारी) प्रतिष्ठानचे अध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी केली. मुख्य पुरस्कार श्री अशोक देशमाने यांना प्रदान करण्यात येणार असून, सन्मान चिन्ह आणि २५हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. अन्य दोन पुरस्कारांचे स्वरूप सन्मान चिन्ह आणि ११हजार रुपये रोख असे असून, पुरस्कारांचे वितरण लवकरच समारंभपूर्वक करण्यात येईल, असे जोशी यांनी सांगितले.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अनाथ मुलांसाठी ‘स्नेहवन’ संस्था अशोक देशमाने यांनी स्थापन केली. आयटी क्षेत्रातील मोठ्या पगाराची नोकरी सोडून २०१५साली त्यांनी हा सामाजिक प्रकल्प हाती घेतला. दोन खोल्यांमध्ये १८ मुलांना घेऊन लावलेले ‘स्नेहवन’ संंस्थेचे रोपटे सध्या आळंदी जवळील पोयाळी येथे दोन एकर जागेत विस्तारले असून ते १८० मुला, मुलींना मायेची सावली देत आहे. अशोक देशमाने यांच्या पत्नी अर्चना यांनीही या कार्यात स्वतःला झोकून दिले आहे. त्यांच्या दोन्ही कन्या आनंदी आणि राधा या मुला, मुलींसमवेतच रहातात. अशोक देशमाने यांच्या आई-वडिलांचेही त्यांना या कार्यात सहकार्य आहे. अशोक देशमाने यांच्या कुटुंबीयांच्या सेवाभावी कार्याचा गौरव व्हावा, अशा उद्देशाने त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.
पं. रघुनंदन पणशीकर यांनी शास्त्रीय गायनात आपला ठसा उमटवला. लहान वयातच रघुनंदन यांना शास्त्रीय गायनाची गोडी लागली. सुरवातीला पंडित वसंतराव कुलकर्णी यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. नंतर गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्याकडून जयपूर अत्रौली घराण्याची तालीम त्यांना मिळाली. किशोरीताईंच्या मातोश्री गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांचेही मार्गदर्शन रघुनंदन यांना लाभले. आजवरच्या वाटचालीत रघुनंदन यांना श्रीमती माणिक वर्मा पुरस्कार, संगीत कलारत्न पुरस्कार, डॉ.प्रभा अत्रे गौरव पुरस्कार, ‘अवघा रंग एक झाला’ हे त्यांच्या स्वरसाजाने नटलेले नाटक मटा पुरस्कार, झी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचे विविध अल्बम्सही प्रसिद्ध झाले आहेत. गेली चार वर्षे पुण्यात गानसरस्वती महोत्सवाचे आयोजन पणशीकर करतात. संगीत क्षेत्रातील सवाई गंधर्व महोत्सव, तानसेन समारोह, केशरबाई केरकर संगीत समारोह अशा प्रतिष्ठित महोत्सवांमधून त्यांनी संगीत सेवा रूजू केली आहे. विदेशातही त्यांनी अनेक मैफिली गाजविल्या आहेत.
जुगल राठी यांनी पुण्यातील सार्वजनिक बससेवा सक्षम व्हावी यासाठी पीएमपी प्रवासी संघ स्थापन केला. या प्रवासी संघाचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी या क्षेत्रात भरीव कामगिरी केली. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, पुणे सायकल प्रतिष्ठान, सजग नागरिक मंच, पीएमपी बस प्रवासी मंच, सिंहगड वारकरी परिवार, माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ, गडकिल्ले भटकंती ग्रुप, पुणे मॅरेथॉन रनर्स, वाहतूक सल्लागार समिती (पुणे पोलीस), शहर फेरीवाला समिती, बॅंक ग्राहक संघटना, पुणे विपश्यना समिती, वंचित विकास, युवक क्रांती दल, लोकायत आंदोलन आणि रक्तदान अशा संस्थांमध्ये जुगल राठी कार्यरत आहेत.
