कपिल पाटील यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
मुंबई: राजकारण राहू दे बाजूला… सामाजिक सलोखा जपला पाहिजे, अशी साद घालत माजी आमदार कपिल पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. समाजात सलोखा निर्माण करू शकतील असे मोजके नेते महाराष्ट्रात आहेत. राज ठाकरे ही त्यापैकी एक आहेत. त्यामुळे आपण आज त्यांची भेट घेऊन सद्य सामाजिक स्थितीवर चर्चा केली, असे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
आरक्षणासह अनेक मुद्द्यांवरून राज्यातील सामाजिक वातावरण गढूळ झले आहे. समाजाच्या अनेक घटकातील सलोखा संपुष्टात येऊन विद्वेषाचे वातावरण निर्माण झाले आहे. राजकीय पोळ्या भाजण्यासाठी लोकांना भडकावले जात आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पुढाकार घेऊन सामाजिक सलोखा निर्माण करावा, असे आवाहन करण्यासाठी पाटील यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. सामाजिक सलोख्यासाठी आपण राज्यातील इतर नेत्यांनाही भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हा फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. राजकारण दुय्यम आहे. समाजात सलोखा राहणे गरजेचे आहे, असे कपिल पाटील यांनी सांगितले. मी चळवळीतून आलेला कार्यकर्ता आहे. राजकारण माझ्यासाठी दुय्यम आहे. विविध सामाजिक प्रश्नांसाठी मी अनेक नेत्यांची भेट घेत असतो. त्यांच्याशी चर्चा करत असतो. त्याचप्रमाणे सामाजिक सलोखा कायम राहावा, यासाठी अनेक नेत्यांना भेटणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
