Monday, August 31, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ मालिकेला रंजक वळण

सोनी मराठीवरील ‘अजब प्रीतीची गजब कहाणी’ ही मालिका प्रेक्षकांमध्ये बरीच लोकप्रिय आहे. अजिंक्यने साकारलेला राजवीर सध्या मुलींच्या गळ्यातला ताईत बनला असून राजवीरसारखा मनमिळाऊ-समजूतदार प्रेमी आपल्यालाही लाभावा, ही समस्त मुलींची सुप्त इच्छा आहे. पण.. पण.. इतर मुलींची इच्छा पूर्ण होण्याआधी आपल्या भाऊसाहेब उर्फ मयूरीच्या हाती हा राजवीर लागतो की नाही, याची उत्सुकता सध्या शिगेला पोहोचली आहे. हे गुपित फार काळ ताणून न धरता आता राजवीरला भाऊसाहेब आणि मयूरी यांचं सत्य लवकरच कळणार आहे म्हटलं तर…

मयूरी आणि भाऊसाहेब यांचं गुपित आता लवकरच राजवीरच्या समोर येणार अशी परिस्थिती येणार आहे. ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ या मालिकेत हा ट्विस्ट येणार आहे. मयूरीचा एक प्रेमळ मित्र तर भाऊसाहेबचा समजूतदार बॉस राजवीर हा एक सच्चा माणूस आहे. मयूरीकडे आकर्षित होणारा राजवीर आपल्या जवळच्या बॉडीगार्डला म्हणजेच भाऊसाहेबला आपल्या दिलाची कहाणी मित्रत्वाच्या  नात्याने सांगत आलेला आहे. मयूरीला राजवीरचं प्रेम कळतंय पण परिस्थितीच अशी आली आहे की मयूरीला राजवीरवरचं प्रेम त्याच्यापासून लपवावं लागतंय. पण नियतीनेच आता मयूरी आणि राजवीर या दोघांना एकत्र आणलंय. आपण राजवीरची फसवणूक करतोय, असं मयूरीला वाटतं आहे. मयूरी आपल्या मैत्रिणीकडे मन मोकळं करत असतानाच राजवीर तिला पाहतो आणि सगळं सत्य त्याला समजतं. मयूरी हीच भाऊसाहेब आहे, हे राजवीरला समजतं. आता यावर राजवीरची प्रतिक्रिया काय असेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. आता तिची प्रतिक्रिया काय असेल? तो मयूरीची अडचण समजून तिला माफ करेल का की मयूरी आणि  राजवीर यांच्यात  दुरावा निर्माण होईल? याचा मयूरीवर काय परिणाम होणार हे सगळं आता मालिकेत पाहायला मिळेल.

भाऊसाहेबच मयूरी आहे, हे  राजवीरच्या समोर येणार आहे. राजवीरने आजवर भाऊसाहेबशी एक मित्र म्हणून बोलताना आपल्या प्रेमाची कबुली आधीच दिली असल्यामुळे मयूरी आपल्याविषयी काय विचार करेल, हा प्रश्न त्याला सतावेल की भाऊसाहेबने उर्फ मयूरीने राजवीरच्या साधेपणाचा फायदा घेतला असा त्याचा समज होईल? या दोघांच्या प्रेमाला लागलेलं हे ग्रहण आता तरी सुटणार का? राजवीर आणि मयूरी एकत्र येतील का? साधा-सरळ-समजूतदार राजवीर अशाही परिस्थितीत शांत चित्ताने विचार करून मयूरीची बाजू समजून घेईल का? या सगळ्या प्रश्नांची मालिका आपल्या सगळ्यांनाच सतावत असेल तर.. त्यासाठी सोम. ते शनि. संध्या. ७.३० वा. सोनी मराठीवरील ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी पाहायला विसरू नका.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading