Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

‘दगडूशेठ’ गणपतीची श्री हनुमान रथातून थाटात मिरवणूक

पुणे : जय गणेश… गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया… च्या जयघोषासोबतच जय श्रीराम, जय श्रीराम च्या नादघोषात श्री हनुमान रथातून निघालेल्या दिमाखदार आगमन मिरवणुकीने वाजत गाजत अयोध्येतील श्रीराम मंदिर प्रतिकृतीत दगडूशेठ चे गणपती बाप्पा विराजमान झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३१ व्या वर्षानिमित्त आयोजित उत्सवाचा प्रारंभ हजारो भक्तांच्या साक्षीने झाला. अयोध्येतील श्रीराम मंदिर प्रतिकृतीमध्ये गणेश चतुर्थीला सकाळी १० वाजून २३ मिनिटांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना झाली.

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष डॉ.रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, सुनिल रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. मुख्य मंदिरापासून सकाळी ८.30 वाजता श्रीं च्या आगमन मिरवणुकीला प्रारंभ झाला. श्रीं ची विलोभनीय मूर्ती डोळ्यात साठविण्यासोबतच दर्शनासाठी भक्तांनी चौका-चौकात गर्दी केली.

मंदिरापासून निघालेली मिरवणूक तांबडी जोगेश्वरी मंदिर, अप्पा बळवंत चौक, नगरकर तालीम चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडई मार्गे उत्सव मंडपात आली. मिरवणुकीमध्ये अग्रभागी देवळणकर बंधूंचा चौघडा, गायकवाड बंधू सनई, दरबार बँड, प्रभात बँड, मयूर बँड यांसह गंधाक्ष ढोल ताशा पथक देखील सहभागी झाले होते. मुख्य पूजा मिलींद राहुरकर यांच्या पौरोहित्याखाली झाली.

डॉ.मोहन भागवत म्हणाले, जगामध्ये शांती, सुबत्ता, परस्पर सौमनस्य नांदो. तसेच भारत हा सुख शांतीचा मार्ग दाखविणारा देश होवो. रोग मुक्त भारत होवो आणि हे सर्व संकल्प पुण्यापासून सर्व विश्वापर्यंत व्यापक होवो, अशी प्रार्थना गणराया चरणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.

ॠषिपंचमीनिमित्त ३१ हजार महिलांचे अर्थवशीर्ष पठण

बुधवार, दिनांक २० सप्टेंबर रोजी पहाटे ६ वाजता ॠषिपंचमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे ३१ हजार महिला सामुदायिकरीत्या अर्थवशीर्ष पठण करणार आहेत. यावेळी पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रात्री १० ते पहाटे ३ वाजेपर्यंत हरी जागर च्या माध्यमातून महाराष्ट्रातील भारतीय वारकरी मंडळ व समस्त वारकरी बंधू वारकरी गजर करीत गणरायाचरणी सेवा अर्पण करणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading