Wednesday, May 6, 2026
Latest NewsPUNE

सर्वोच्च न्यायालयाची मोदी सरकारला चपराक – अतुलकुमार अंजान

पिंपरी : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून राहुल गांधी यांना खासदारकी पुन्हा बहाल केली आहे. ही स्वागतार्ह घटना असून भाजपा प्रणीत नरेंद्र मोदी सरकारला मोठी चपराक आहे. मोदींनी आपल्या राजकीय विरोधकांची मुस्कटदाबी करण्याची अवलंबलेली लोकशाही विरोधी नीती उघड झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या निकालातून घटनात्मक न्याय प्रणालीचा नवा मानदंड स्थापित केला आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस माजी खासदार अतुलकुमार अंजान यांनी केले आहे.
आकुर्डी येथे महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाकपा नेते डॉ. भालचंद्र कांगो, भाकप राज्य सरचिटणीस कॉ. सुभाष लांडे, आयटकचे अनिल रोहम, अरविंद जक्का, लता भिसे आदी उपस्थित होते.

अंजान म्हणाले की, देशातील शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याची व कर्जबाजारी बनविणारे धोरणे भाजप सरकार राबवीत आहे. यातून शेतकरी आत्महत्यामध्ये मोठ्‌याप्रमाणावर वाढत आहेत. शेतकर्याना आपल्या शेतीमाल उत्पादनाच्या आधारभूत किंमतीत नगण्य वाढ जाहीर करून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. या विरुद्ध शेतकऱ्यांच्या देशभरातील सर्व संघटनांना एकत्रित करून संयुक्त किसान मोर्चा या शेतकरी आंदोलनाच्या व्यासपिठा मार्फत पुन्हा एकदा देशव्यापी लढ्याचा पुकारा करण्यात येत आहे. दि. ९ ऑगस्टला देशभर ‘कार्पोरेट दलालों गद्दी छोडो’ हे आंदोलन देशातील शेतकरी आणि कामगार संघटनांनी पुकारले आहे. महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या बैठकीत महाराष्ट्रातील २८ जिल्ह्यांतून बैठकीत सहभागी झालेल्या पदाधिकारी यांनी सहभाग घेवून महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनाच्या महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करून लढ्याचा कृती कार्यक्रम निश्चित केला.

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना शेतीपंप साठी मोफत आणि २४ तास वीज उपलब्ध झाली पाहिजे. यासाठी मोठे अभियान किसान सभा सुरु करीत आहे. महामार्ग आणि प्रकल्प या साठी कवडीमोल भावाने जमिनी संपादित करून शेतकऱ्यांच्या मालमत्तेवर सरकार दरोडा घालत आहे. या कवडीमोल भावाने जमीन संपादित करण्याविरुद्ध प्रखर आंदोलन करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला आहे. याच बरोबर पाथरी जि. परभणी येथे ऊस उत्पादकांची परिषद, अमरावती येथे कापूस- सोयाबीन उत्पादकांची परिषद, गडचिरोली आणि ठाणे येथे धान, भात उत्पादकांची परिषद, धुळे येथे केळी उत्पादक शेतकऱ्यांची परिषद आणि वरुड मोर्शी येथे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची परिषद किसान सभेच्या वतीने आयोजित करून त्यांच्या मागण्याबाबत लढा किसान सभेच्या द्वारे पुकारण्यात येत आहे. किसान सभेचे सरचिटणीस कॉमेड राजन क्षीरसागर आणि उपाध्यक्ष बन्सी सातपुते हे भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे परभणी आणि शिर्डी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार असून त्याला समस्त शेतकरी समुदायाने समर्थन करून निवडून आणावे, असे आवाहन किसान सभेने केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading