अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न दिल्यास पुरस्काराचीच उंची वाढेल – विश्वास पाटील
पुणे : भारतरत्न पुरस्काराचा दर्जा व उंची वाढवायची असेल तर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा असे परखड मत जेष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी पुण्यातील जाहीर सभेत व्यक्त केले .
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त पुणे शहर जिल्हा मातंग समाजाने पुण्यातील सारसबाग येथे जाहीर अभिवादन सभा आयोजित केली होती त्या सभेत विश्वास पाटील मार्गदर्शन करीत होते.पुढे ते म्हणाले की ,मराठी साहित्यिकांनी लोकशाहीर अण्णा साठे यांची उपेक्षा केली .त्यांना मराठी साहित्याच्या इतिहासात दखल घेतली गेली नाही .इतक्या मोठ्या प्रतिभावान साहित्यिकाला अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुद्धा केले नाही परंतु रशिया आणि जगभरात त्यांच्या साहित्याची दखल घेतली गेली . आज त्यांच्या साहित्याचे भारतातील व जगभरातील बऱ्याच भाषेत भाषांतर झाले आहे असे ते म्हणाले.
यावेळी मातंग समाजासाठी योगदान दिलेल्या रवींद्र आरडे यांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे समाजभूषण तर वीर फकिरा पुरस्कार अजित इंगळे यांना आणि मुक्ता साळवे पुरस्कार डॉ.प्रिया सोपान शेंडगे यांना पुरस्काराने विश्वास पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले .यावेळी आमदार सुनील कांबळे,झोपडपट्टी सुरक्षा दलाचे नेते भगवानराव वैराट ,माजी सभागृह नेते सुभाष जगताप ,माजी नगरसेवक अविनाश बागवे ,माजी नगरसेवक आनंद रीठे ,डॉ.भरत वैरागे ,अनिल हतागळे ,पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे स्वागताध्यक्ष पंढरीनाथ आढळगे व सचिव दयानंद अडागळे व्यासपीठावर उपस्थित होते .या कार्यक्रमास पूने शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
