ऑगस्टमध्ये होणार अजितदादा मुख्यमंत्री?
मुंबई : राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात फुट पाडून महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे अजित पवार, संसदेचे पावसाळी अधिवेशन ११ ऑगस्टला संपल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असे वृत्त एका इंग्रजी न्यूज पोर्टलने दिले आहे.
महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या सर्व १६ आमदारांना अपात्र ठरवतील, त्यानंतर त्यांना पदाचा राजीनामा देण्यास सांगितले जाईल ज्यामुळे मंत्रिमंडळ बरखास्त होईल, असे रेडिफने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या आशीर्वादाने दिल्लीत हा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे, असा दावा अहवालात करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांना शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सामील होण्यास आणि संसदेचे पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत प्रतीक्षा करण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर, भाजपने त्यांना राज्याचा पुढील मुख्यमंत्री म्हणून नेमण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले आहे.
२० जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंविरुद्ध बंड करून भाजपसोबत सरकार स्थापन करण्यापूर्वी अजित पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी नियमित संपर्कात होते. परंतु भाजपने अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याची मागणी फेटाळल्यामुळे शेवटच्या क्षणी ही योजना फसली, असा दावा अहवालात करण्यात आला आहे.
अजित पवार मार्च (२०२२) पासून अमित शहा यांच्या नियमित संपर्कात होते; शिंदे यांच्या बंडखोरीपूर्वीच अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी मान्य केली असती तर त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले असते, असे राष्ट्रवादीच्या एका नेत्याने म्हटले आहे.
