योग्य विचार आणि जिद्द असेल तर व्यवसायात यश – आमदार रोहित पवार
पुणे : व्यवसायात चढ- उतार असतात. त्यामुळे लगेच यश मिळेल असे नाही, यश मिळायला वेळ जातो. कष्ट करण्याची तयारी ठेवा. परंतु यश मिळाल्यावर तुमच्यात अहंकार आणू नका. अहंकार मध्ये आला तर व्यवसायाची आणि आपली देखील वाढ होत नाही. आपल्यापेक्षा कोणीतरी मोठा आहे,ही जाणीव कायम ठेवायला हवी. व्यवसायात विचार महत्त्वाचा आहे. योग्य विचार आणि जिद्द असेल तर कोणताही व्यवसाय मोठा होऊ शकतो. असे मत आमदार रोहीत पवार यांनी व्यक्त केले.
शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळाच्या वतीने आयोजित आॅनलाईन महागणेशोत्सवातील घेऊ भरारी – चला उद्योजक बनूयात या कार्यक्रमात यशस्वी युवा उद्योजक आणि आमदार रोहित पवार यांच्याशी संवाद साधण्यात आला. सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष रविंद्र बरीदे, शिरीष मोहिते, वैभव वाघ, निलेश रनसिंग, गणेश देशपांडे,तन्मय तोडमल, विक्रांत मोहिते, अमेय थोपटे, कुणाल जाधव, गणेश सांगळे,प्रसाद भारदे उपस्थित होते.
रोहित पवार म्हणाले, पूर्णवेळ सामाजिक कार्य करताना आपल्या जवळच्या लोकांना विश्वासात घ्या. आपल्या जबाबदाºया सांभाळून देखील सामाजिक कार्य करता येते. किती वेळ समाजकारणात आहात यापेक्षा किती काम केले याला महत्त्व आहे.
राजकारणात येण्यासाठी पैसा लागतो असे म्हणतात, परंतु आपल्यामागे लोकांची ताकद असेल तर पैसा लोकांच्या ताकदीसमोर कमी पडतो. समाजकारण ,राजकारण हे लोकांच्या सेवेसाठी आहे हे लक्षात ठेवावे लागेल. व्यकितगत हित होईल असा विचार ठेवू नका, असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्ष रविंद्र बरीदे म्हणाले, श्री गणेश पुराण, स्वराज्याचे शिलेदार प्रेरणापर्व, गणेशोत्सव माझा, घेऊ भरारी यांसारख्या नाविन्यपूर्ण कार्यक्रमांनी सेवा आॅनलाईन महागणेशोत्सव सजणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष कार्यक्रम घेणे शक्य नसले, तरी देखील आॅनलाईन स्वरुपात केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभरातील गणेशभक्तांकरीता अनुभविता येतील.
https://www.facebook.com/SevaMitraMandal या फेसबुक पेजवरुन तसेच मंडळाच्या https://www.youtube.com/SevaMitraMandal ’ युट्यूबवरुन हे कार्यक्रम विनामूल्य गणेशभक्तांना पाहता येणार आहेत. तरी नागरिकांना याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
