Sunday, June 21, 2026
Latest NewsPUNE

दिव्यांगांना सन्मानाने जगण्याचे साधन उपलब्ध करून द्यावे – राहुल देशमुख

जय गणेश व्यासपीठाच्या माध्यमातून जागतिक पितृदिनानिमित्त विशेष कार्यक्रम संपन्न 

पुणे : शारीरिक उणीवांवर मात करून विविध क्षेत्रांत कर्तृत्वाचे शिखर गाठणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना केवळ पुरस्कार देणे पुरेसे नाही, तर त्यांना सन्मानाने उदरनिर्वाह करता येईल अशी साधने उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते व एनएडब्ल्यूपीजीचे प्रमुख राहुल देशमुख यांनी व्यक्त केले.

साईनाथ मंडळ ट्रस्ट, एकता मित्र मंडळ , श्री शिवाजी मित्र मंडळ , वीर शिवराज मित्र मंडळ आणि अचानक मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जय गणेश व्यासपीठाच्या माध्यमातून जागतिक पितृदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिव्यांग मुलांच्या पित्यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी साहित्यिक डॉ. संगीता बर्वे, उदय जगताप, सचिन पवार, विक्रम गोगावले, हर्षद नवले, नरेंद्र व्यास, विनायक इंगवले, गोविंदा वरण दाणी , अमित जाधव, विविध मंडळाचे अध्यक्ष व आयोजक पियुष शाह, किरण सोनिवाल, सुधीर ढमाले, प्रल्हाद थोरात, ऋषिकेश भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते.

अंध सनदी लेखापाल व शास्त्रीय गायक भूषण तोष्णीवाल यांचे वडील नंदकिशोर तोष्णीवाल, कर्णबधिर भरतनाट्यम नर्तिका प्रेरणा सहाणे यांचे वडील केशव सहाणे, दिव्यांग नर्तिका सायली आगवणे यांचे वडील नंदकिशोर आगवणे तसेच राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू गौरी गाडगीळ यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित ‘यलो’ चित्रपटामुळे प्रसिद्ध असलेल्या गौरीचे वडील शेखर गाडगीळ यांचा राहुल देशमुख आणि साहित्यिक डॉ. संगीता बर्वे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

देशमुख म्हणाले, “दिव्यांग असूनही सर्वसामान्य व्यक्तींनाही कठीण वाटतील अशी अनेक कार्ये या मुलांनी करून दाखवली आहेत. त्यांच्या भविष्यासाठी शासनाने विशेष धोरण आखून त्यांना चांगल्या पदांवरील सरकारी नोकऱ्या, आर्थिक सहाय्य आणि मानधन उपलब्ध करून द्यावे. पालकांच्या पश्चातही त्यांच्या जगण्याची आबाळ होणार नाही, याची हमी शासनाने द्यायला हवी.”

डॉ. संगीता बर्वे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आजच्या काळात नैराश्य, मानसिक ताण आणि नकारात्मक विचारांमुळे तरुण पिढी अनेक समस्यांना सामोरी जात आहे. अशा परिस्थितीत अपंगत्वावर मात करून यश संपादन करणारी दिव्यांग मुले आणि त्यांना घडवणारे पालक समाजासाठी प्रेरणास्थान आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अशा यशस्वी दिव्यांग तरुणांचे कर्तृत्व समाजासमोर आणण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

कार्यक्रमात सत्कारमूर्तींच्या पालकांनीही आपल्या संघर्षमय प्रवासाचे अनुभव कथन केले. पियुष शाह यांनी प्रास्ताविकात प्रमुख पाहुणे व सत्कारार्थींचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष जराड यांनी केले, तर सुधीर ढमाले यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रल्हाद थोरात किरण सोनीवाल पीयूष शाह व सुधीर ढमाले यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading