Thursday, June 11, 2026
PUNE

पार्थच्या मताला कवडीचीही किंमत देत नाही – शरद पवार

मुंबई, दि. १२ – सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून सध्या राज्यात भाजप आणि शिवसेनेत राजकीय वाद सुरू झालेला असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली आहे.

शरद पवार आणि संजय राऊत यांच्यामध्ये मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांनी शरद पवारांना सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना शरद पवारांनी हे विधान केलेलं आहे. ‘माझ्या नातवाच्या मताला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही. तो इमॅच्युअर आहे’, असं शरद पवार म्हणाले आहेत. त्यामुळे त्यांच्या या विधानावरून मोठी राजकीय चर्चा सुरू झाली असून पवार कुटुंबातला अंतर्गत वादच या विधानातून समोर आल्याचं देखील बोललं जात आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटरमधून शरद पवार बाहेर पडल्यानंतर पत्रकारांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून (Sushant Singh Rajput Suicide Case) सुरू असलेल्या गोंधळावर त्यांची प्रतिक्रिया विचारली. तेव्हा पवार म्हणाले, ‘मुंबई पोलिसांना मी ५० वर्षांपासून ओळखतो. माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केल्यानंतर निश्चितच आपल्याला दु:ख होतं. पण ज्या पद्धतीने त्याची चर्चा होत आहे, त्यावर मला आश्चर्य वाटतंय. मी साताऱ्यात असताना एका शेतकऱ्यानं माझा हात धरून म्हटलं, ‘एका कलाकाराने आत्महत्या करण्याचं वाईट वाटतं. पण ज्या पद्धतीने त्याची चर्चा होते, त्यावर मला आश्चर्य वाटतं. माझ्या जिल्ह्यात २० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पण त्याची मीडिया दखल घेत नाही. त्यामुळे हे प्रकरण मला इतकी चर्चा करण्यासारखं वाटत नाही. त्याची इतकी चर्चा करण्याचं काही कारण नाही’, असं पवार म्हणाले.

दरम्यान, सुशांतसिंह राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी केली जावी, अशी मागणी मोठ्या प्रमाणावर करण्यात आली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनंतर तपास CBI ने हाती घेतला. मात्र, त्यानंतरही CBI ने या तपासात येणं म्हणजे मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवण्यासारखं असल्याची टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी आपली भूमिका मांडली आहे. ‘मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे तपास योग्यच होईल. पण तरी जर कुणाला वाटत असेल की सीबीआय चौकशी करावी, तर त्याला आम्ही विरोध करणार नाही’, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

यावेळी ‘आपला नातू पार्थ पवार यांनीच या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्यावर काय सांगाल?’ असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवारांना विचारला. मात्र, त्यावर शरद पवारांनी केलेलं विधान राजकीय खळबळ उडवून देणारं ठरलं. ‘माझ्या नातवाच्या म्हणण्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही. तो अपरिपक्व आहे. पण जर कुणाला सीबीआय चौकशीची मागणी असेल, तर माझं त्यावर काहीही म्हणणं नाही’, असं पवार म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading