Wednesday, June 17, 2026
ENTERTAINMENT

उलगडणार सुखाची नवी परिभाषा

सुख म्हणजे नक्की काय असतं हा प्रश्न आपल्याला कुणी विचारला तर त्याची असंख्य उत्तरं आपल्याला मिळतील. प्रत्येकाची आपली अशी सुखाची व्याख्या असते. कुणासाठी पैसे म्हणजे सुख, कुणासाठी समाधान म्हणजे सुख तर कुणासाठी जगण्यातला आनंद म्हणजे सुख. सुखाची हीच परिभाषा स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतून उलगडण्यात येईल. स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती कोठारे व्हिजन्सची असून सुप्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कणसे ही मालिका दिग्दर्शित करत आहेत. खास बात म्हणजे अभिनेत्री वर्षा उसगांवकर या मालिकेत नंदिनी ही भूमिका साकारणार आहेत.  बऱ्याच वर्षांनंतर त्या मालिकाविश्वात कमबॅक करत आहेत. वर्षाजींना आतापर्यंत आपण ग्लॅमरस रुपात पाहिलं आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतला त्यांचा घरंदाज सासुचा अंदाज नक्कीच वेगळा ठरणार आहे.

या मालिकेचं वेगळेपण सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका एक कौटुंबिक मालिका आहे. सर्वसाधारण आयुष्यात आपल्या समोर जे प्रसंग आणि जी आव्हानं येतात ती आपण पेलत जातो. मालिकेत नेमकं हेच सांगण्याचा प्रयत्न आहे. लाख गोष्टी ठरवल्या असल्या तरी विधीलिखीत जे असतं तेच होतं. यातून आपलं सुख आपण कसं शोधत जातो तेच ‘सुख म्हणजे काय असतं’ या मालिकेत खूप सुंदररित्या मांडण्यात आलं आहे.’

या मालिकेत वर्षा उसगावकर, मंदार जाधव, गिरीजा प्रभू, माधवी निमकर, सुनील गोडसे, गणेश रेवडेकर अशी कलाकारांची तगडी फौज मालिकेत आहे. मंदार जाधवला या आधी स्टार प्रवाहच्या श्री गुरुदेव दत्त मालिकेत श्री दत्तांच्या भूमिकेत प्रेक्षकांनी पाहिलं आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील नव्या भूमिकेविषयी सांगताना मंदार म्हणाला, ‘श्री गुरुदेव दत्त नंतर पुन्हा एकदा स्टार प्रवाहची मालिका करतोय याचा प्रचंड आनंद आहे. कोल्हापूरात घडणारी ही गोष्ट आहे. जयदीप असं माझ्या व्यक्तिरेखेचं नाव असून तो परदेशात शिकलेला मुलगा आहे. जयदीप अन्यायाविरोधात नेहमी उभा ठाकतो आणि हेच त्याचं वेगळेपण आहे. आदर्श मुलगा, आदर्श भाऊ, आदर्श जावई याचं उत्तम उदाहरण म्हणून जयदीप या पात्राचा उल्लेख करता येईल. श्री दत्तांच्या रुपात प्रेक्षकांनी मला भरभरुन प्रेम दिलं त्यामुळे नव्या मालिकेतला माझा नवा अंदाजही प्रेक्षकांना आवडेल अशी आशा आहे.’

अभिनेत्री गिरीजा प्रभूचीही प्रमुख भूमिका असलेली ही पहिलीच मालिका. या मालिकेतील गौरी ही व्यक्तिरेखा साकारणं ही खूप मोठी जबाबदारी असल्याचं तिने सांगितलं. मालिकेचे दिग्दर्शक चंद्रकांत कणसे यांच्याकडून खूप गोष्टी शिकायला मिळत आहेत. प्रोमोजना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिलाय. त्यामुळे मला आता १७ ऑगस्टची उत्सुकता आहे असं गौरी म्हणाली. तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ १७ ऑगस्टपासून रात्री ९.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading