कोरोना – देशात मागील २४ तासांत ५२ हजार ०५० नवे रुग्ण; तर ८०३ मृत्यू
नवी दिल्ली, दि. ४ – देशात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर झाल्याचे बघायला मिळाले. मागील २४ तासांत पहिल्यांदाच ५२ हजाराहून अधिक नवीन कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. यासह, ८०३ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. देशात आज संक्रमित झालेल्यांची संख्या १८ लाखांच्या पुढे गेली आहे, तर ३८ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्याची संख्या १८ लाख ५५ हजार ७४६ झाली आहे तर सध्या ५ लाख ८६ हजार २९८ Active रूग्ण आहेत. तसेच १२ लाख ३० हजार ५१० कोरोना रूग्णांनी कोरोनावर मात केली असून रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ३८ हजार ९३८ जणांचा मृत्यूही झाला.
राज्यात पुन्हा एकदा नवीन कोरोनाबाधित रुग्णसंख्येपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहेत. राज्यात २४ तासांत ८ हजार ९८४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २६६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ५० हजार १९६वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत १५ हजार ८४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिलासा देणारी बाब म्हणजे २४ तासांत राज्यात सर्वाधित १० हजार २२१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत २ लाख ८७ हजार ३० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या राज्यात १ लाख ४७ हजार ०१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
