छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजाला दिलेला विचार, संस्कार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक – महापौर मंजुषा नागपुरे
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजाला दिलेला विचार, संस्कार नव्या पिढीपर्यंत पोहचवण्याचे काम अव्यहतपणे सुरु ठेवण्याची आवश्यकता असल्याचे मत पुण्याच्या नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे यांनी व्यक्त केले. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे आज आंबेगाव बुद्रुक येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीमध्ये आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी आयोजित एका कार्यक्रमात नागपुरे बोलत होत्या.
शिवजयंतीच्या निमित्ताने आंबेगाव भागातील नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेवक हरिदास चरवड, कोमल नवले, जयश्री भूमकर, लहू लायगुडे, अरुण राजवाडे, संदीप बेलदार, प्रतिभा चोरगे, व्यंकोजी खोपडे, स्मिता कोंढरे, सीमा बेलदरे यांचा आज शिवसृष्टीमध्ये नागपुरे यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला. यावेळी शिवसृष्टीचे विश्वस्त अमृत पुरंदरे, विनित कुबेर, मनोज पोचट, मुख्य प्रशासकीय अधिकारी अनिल पवार आदी उपस्थित होते.
लोककल्याण करण्यासाठी आयुष्य वेचलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला खूप काही दिले आहे. त्यामध्ये त्यांचे विचार आणि संस्कार हे खूप महत्वाचे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी दिलेले विचार आणि संस्कार नव्या पिढीपर्यंत अखंडपणे पोहचवण्याचे काम आपल्याला करायचे आहे. विशेष म्हणजे भविष्यकाळामध्ये येणाऱ्या प्रत्येक पिढीने हे काम सुरु ठेवायचे आहे, असे नागपुरे यावेळी म्हणाल्या.
छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन शास्त्र हे उत्तम होते. आताच्या पिढीमध्ये शिक्षण घेत असणारी मुले त्याचा बारकाईने अभ्यास करत आहेत, ही चांगली बाब आहे. त्याचा त्यांना निश्चितपणे फायदा होत असेल, असे नागपुरे यांनी नमूद केले.
आपल्याला शिवसृष्टीमध्ये आल्यावर देवळात आल्यासारखे वाटते. इथे एक वेगळी ऊर्जा मिळते, इतकेच नव्हे तर आपले विचार प्रखरपणे मांडण्याची ऊर्जा मिळते, त्यामुळे इथे सारखे यावेसे वाटत असल्याची भावना नागपुरे यांनी यावेळी व्यक्त केली. विनीत कुबेर यांनी आभार मानेल.
