Wednesday, June 3, 2026
Latest NewsLIFESTYLE

निसर्गचित्रकार अशोक साळुंखे यांच्या चित्रप्रदर्शनात अनुभविता येणार रंगांची समृद्धी, प्रकाश-छायांचा खेळकरपणा

 

‘चित्रकर्म’ या भव्य चित्रप्रदर्शनाचे १६ ते २१ सप्टेंबर दरम्यान राजा रवि वर्मा आर्ट गॅलरी येथे आयोजन

पुणे : कला ही केवळ अभिव्यक्ती नसून ती निसर्गाशी संवाद साधण्याची एक नाजूक प्रक्रिया आहे. या विचाराने गेली १९ वर्षांहून अधिक काळ या कलेला वाहून घेतलेले, निसर्गचित्रणासाठी ओळखले जाणारे प्रसिद्ध नेचर लँडस्केप आर्टिस्ट अशोक बाळकृष्ण साळुंखे यांच्या ‘चित्रकर्म’ या भव्य चित्रप्रदर्शनाचे आयोजन दि. १६ ते २१ सप्टेंबर, २०२५ दरम्यान घोले रस्त्यावरील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून रंगांची समृद्धी, प्रकाश-छायांची खेळकरता आणि वातावरणाचा गहिरा भाव प्रेक्षकांना थेट निसर्गाची अनुभूती देईल.

सदर प्रदर्शनाचे उद्घाटन दि. १६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता आमदार सत्यजित देशमुख, पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष योगेश मुळीक आणि कोल्हापूरचे समकालीन भारतीय प्रतिकात्मक व शिल्पकला कलाकार संजीव संकपाळ यांच्या हस्ते होणार असून, या प्रसंगी कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित असतील. उद्घाटनाच्या औपचारिक कार्यक्रमानंतर १७ सप्टेंबर पासून सकाळी ११ ते सायं ७ पर्यंत सदर प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असेल.

‘कॅनव्हासवरील रंगांची समृद्धी अनुभवा’ या संदेशाखाली आयोजित या प्रदर्शनात साळुंखे यांनी गेल्या अनेक वर्षांत साकारलेली निवडक चित्रे प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रांतून ग्रामीण व शहरी जीवनाचे भान, निसर्गातील ऋतुचक्राचे सौंदर्य, तसेच भारतीय संस्कृतीतील निसर्गाशी असलेले अतूट नाते सर्वांसमोर येईल, असा विश्वास अशोक साळुंखे यांनी व्यक केला.

निसर्ग हेच माझे मुख्य प्रेरणास्थान असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले, “निसर्ग हा भावनांचा आरसा आहे. रंग आणि रेषांमधून निसर्गाशी नवे नाते जुळावे, हीच माझी इच्छा आहे. प्रेक्षकांनी केवळ चित्र पाहू नये, तर त्या चित्रातून निसर्गाच्या गाभ्याशी संवाद साधावा, हीच माझी खरी कला आहे.”

अशोक साळुंखे यांनी आपले कला शिक्षण रा. स. गोसावी कलानिकेतन महाविद्यालय, कोल्हापूर येथून पूर्ण केले. सुरुवातीला त्यांनी इलस्ट्रेशन आर्टिस्ट म्हणून व्यावसायिक कारकीर्द सुरू केली. मात्र, कलेतील अस्सल अभिव्यक्तीची ओढ त्यांना नेचर लँडस्केप पेंटिंगकडे घेऊन गेली. ग्रामीण जीवनातील साधेपणा, निसर्गातील बदलते ऋतू, पर्वतरांगांची भव्यता, समुद्रकिनाऱ्यांची शांतता आणि शहरी जीवनातील गतीमानता या सर्व पैलूंना आपल्या कॅनव्हासवर जिवंत करण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न त्यांनी केला आहे.

गेल्या दोन दशकांमध्ये अशोक साळुंखे यांनी अनेक कार्यशाळा घेऊन नवोदित कलाकारांना मार्गदर्शन केले आहे. “कला ही जीवनाचा अविभाज्य भाग आहे. ती आपल्याला संवेदनशील बनवते आणि जगाकडे पाहण्याची नवी दृष्टी देते,” असे ते म्हणतात.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading