‘एकनाथ शिंदे यांना बोलू दिले जात नाही’ मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीसांवर आरोप
जालना: एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी शपथ घेतली होती. मात्र, त्यांना बोलू दिले जात नाही. त्यांचा आवाज दडपण्यात येतो, असा आरोप मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला. देवाधर्माच्या नावाखाली आपल्याला मुंबईला जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असेही ते म्हणाले.
आपण मुंबईकडे कूच करत आहोत. यावेळी राजकीय क्षेत्रातील सत्ताधारी असो वा विरोधक, मराठा समाजातील नेत्यांची, समाजातील श्रीमंत वर्गाची समाजाला गरज आहे. समाज त्यांच्या पाठीशी उभा आहे. आता त्यांनी समाजाच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. या संघर्षाच्या घडीला त्यांनी आम्हाला मदत करावी, आम्ही त्यांना कधीही विसरणार नाही. जे मदत करणार नाहीत ते समाजासमोर उभे पडतील, असेही जरांगे पाटील म्हणाले.
बीड जिल्हा सुरुवातीपासूनच मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्र राहिला आहे. जरांगे पाटील यांच्याबरोबर हजारो ट्रक आणि इतर वाहने अंतरवली सराटीत दाखल झाली आहेत. पंधरा दिवस पुरेल एवढा शिधा घेऊन आंदोलक मुंबईकडे निघाले आहेत. आंदोलकांनी वर्गणी काढून वाहनांची व्यवस्था केली असल्याचे सांगितले.
