महाराष्ट्रात मराठी भाषेचा अभिमान बाळगणे योग्य आणि आवश्यकच – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नवी दिल्ली: महाराष्ट्रात मराठी भाषेचा अभिमान बाळगणे योग्य आणि आवश्यकच आहे. मात्र, मराठी येत नाही किंवा बोलत नाही म्हणून कोणाला मारहाण करणे राज्यात खपवून घेतले जाणार नाही. असे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या सामरिक व संरक्षण विशेष अध्यासनाचा कोनशीला समारंभ आणि मराठी भाषेच्या अभ्यासासाठी सुरू करण्यात आलेल्या कुसुमाग्रज अध्यासनाचा उद्घाटन समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य भाषा मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यावेळी फडणवीस बोलत होते.
मराठी ही अतिप्राचीन भाषा असून त्यामुळेच आमची विनंती मान्य करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. महाराष्ट्रात मराठीचा अभिमान बाळगणे योग्यच आहे. मात्र, भाषेच्या मुद्द्यावरून मारहाण करणे खपवून घेतले जाणार नाही. तसे करणाऱ्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे फडणवीस यांनी बजावले.
मराठी भाषेने देशाला समृद्ध केले आहे. जर एखाद्या भाषेने संपूर्ण देशातील नाट्यसृष्टी जगवली असेल तर ती भाषा मराठी आहे. मराठी भाषेचा अभिमान बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळेच या भाषेचे अध्ययन आणि संशोधन झाले पाहिजे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात सुरू करण्यात आलेले कुसुमाग्रज अध्यासन याच दृष्टिकोनातून काम करणार आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले.
मातृभाषेचा अभिमान हा प्रत्येक नागरिकाला असलाच पाहिजे. त्याचबरोबर प्रत्येक भारतीय भाषेचा आदर करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपण इंग्रजीचा सहज स्वीकार करतो आणि भारतीय भाषांना नाकारतो ही बाब अयोग्य आहे. महाराष्ट्रात सुरू असलेला वाद हा केवळ हिंदी आणि मराठी यांच्यातील वाद नाही. मराठी बरोबरच इतर भारतीय भाषांचा आदर आणि स्वीकार करणे आवश्यक आहे, असे फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्रात मराठीचा आग्रह धरला जाणे स्वाभाविक आहे. ते आवश्यकही आहे. मात्र, भाषेवरून वाद होणे, त्याने मारामारी पर्यंत टोक गाठणे हे कदापी सहन केले जाणार नाही. अशा प्रकरणात आम्ही यापूर्वी देखील कारवाई केली आहे आणि यापुढे देखील कठोर कारवाई केली जाईल, याची जाणीवही फडणवीस यांनी करून दिली.
