भगवंताची आठवण ही जीवनाची सगळ्यात मोठी पुंजी – पूज्य राजन जी महाराज
पुणे : जेव्हा आपण भगवंताची आठवण ठेवतो तेव्हा तो आपल्यावर दया करतो. दुःखात भगवंताचे स्मरण असते. जीवनात जो पर्यंत दुःख नसते तो पर्यंत भगवंताची आठवण येत नाही. त्यामुळे प्रार्थना करा की आयुष्यात थोडी उणीव राहू द्या जेणेकरुन भगवंताची आठवण आपल्याला येत राहील. भगवंताची आठवण राहणे ही जीवनाची सगळ्यात मोठी पुंजी आहे, असे पूज्य राजन जी महाराज यांनी सांगितले.
श्री गौड ब्राह्मण समाज, श्री चारभुजानाथ मंदिर राम कथा समितीतर्फे श्रीराम कथा प्रेम यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. चित्रकूट धाम, वर्धमान लॉन्स समोर, बिबवेवाडी कोंढवा रस्ता येथे आयोजित कथा सोहळ्यात शेवटच्या दिवशी प्रेममूर्ती पूज्य संत श्री प्रेमभूषणजी महाराज यांचे कृपापात्र पूज्य राजन जी महाराज यांनी निरूपण केले.
राजन जी महाराज म्हणाले, अधिकार मिळत असताना आधी विचार केला पाहिजे की माझ्यात हा अधिकार मिळवण्याची पात्रता आहे का? जर पात्रता नसेल, तर पात्रता नसताना अधिकार मिळणे हेच विनाशासाठी पुरेसे ठरते.
ते पुढे म्हणाले, शाप ही जर देवाच्या कामासाठी उपयोगी पडला, तर तो आशीर्वाद होतो. भगवान रामाच्या दिव्य गुणांचे वर्णन करताना अनेक प्रसंगांमध्ये मानवी जीवनातील शाप, आशीर्वाद आणि त्यांचे कर्माशी असलेले नाते यावर त्यांनी निरुपण केले.
श्रीराम कथा प्रेमयज्ञ सोहळ्यात श्रीराम कथा महिमा आणि शिव-पार्वती विवाह, श्रीराम जन्म उत्सव, श्री बाल लीला, श्री सीताराम विवाह महोत्सव, श्री केवट प्रेम, श्री राम मंगल यात्रा, श्री भरत चरित्र, श्री शबरी प्रेम, सुंदरकाण्ड आणि श्री राम राज्याभिषेक याविषयी पूज्य राजनजी महाराज यांनी निरूपण केले. पुणेकरांनी मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभाग घेतला.
