राजकारणात उतरण्याशिवाय पर्याय नाही – मनोज जरांगे पाटील
नाशिक: मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून आरक्षण मिळवण्यासाठी राजकारणात उतरण्याशिवाय पर्याय नाही, असे सांगत आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व मतदारसंघात आपले उमेदवार उभे करण्याबाबत मनोज जरागे पाटील चाचपणी करीत आहेत. या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना मोठा दणका देण्याचा त्यांचा निर्धार आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा समाजाचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे या विभागात मराठा समाजाच्या नाराजीचा मोठा फटका सत्ताधाऱ्यांना बसू शकतो. या विभागात महायुतीला नामशेष करण्याचा निर्धार मराठा आंदोलकांनी केला आहे. एवढ्यावरच न थांबता राजधानी मुंबईतही सत्ताधाऱ्यांना दणका देण्यासाठी डावपेच आखले जात आहेत.
मुंबईच्या लोकसंख्येत मराठा समाजाचे प्रमाण 17 ते 18 टक्के आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या 19 विधानसभा मतदारसंघात मराठा आंदोलकांच्या वतीने उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. या निवडणुकीत आमचे उमेदवार निवडून आले नाही तरीही त्यांच्या उमेदवारीने सत्ताधाऱ्यांना मोठा फटका बसल्याशिवाय राहणार नाही, असा जरागे पाटील यांचा दावा आहे.
विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी 29 ऑगस्ट रोजी मराठा समाजाची बैठक होत आहे. या बैठकीत होणारा निर्णय अंतिम असेल, असे जरागे पाटील यांनी सांगितले
