Monday, May 18, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

हिंजवडी येथील वाहतूक कोंडी, कचरा, नागरिकांची सुरक्षा आणि अन्य समस्यांवर उपाययोजना करा

वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन विकास आराखडा करण्याबाबत सुळे यांचे पालकमंत्र्यांना पत्र
पुणे : जागतिक दर्जाचे ‘आयटी हब’ अशी ओळख असणाऱ्या हिंजवडी येथील ‘राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान’ परिसरातील रस्त्यांची दुरावस्था व वाहतूक कोंडी यावर तातडीने उपाय योजना करण्याबरोबरच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, नागरिकांची सुरक्षितता या सारख्या पायाभूत सुविधा गतीने पूर्ण करण्यात याव्यात, यासाठी संबंधीत सर्व शासकीय आस्थापनांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आराखडा तयार करण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी शासनाकडे केली आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना त्यांनी याबाबत पत्र दिले असून हिंजवडी येथील वाहतूक समस्या दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. हिंजवडी परिसर व एम आय डी सी येथील समस्यांवर मार्ग काढण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी, पीएमआरडीए, पीएमसी, पीसीएमसी, एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हा परिषद, पोलिस प्रशासन आणि इतर संबंधित शासकीय यंत्रणांची संयुक्तिक बैठक घ्यावी, तसेच या परिसराची पाहणी करून, विकास करण्याकरिता विकास आराखडा करण्यात यावा, असे सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

या भागातील माण, मारुंजी, म्हाळूनगे, भूमकर चौक या मार्गावरून पुण्यातील विवीध भागातून उद्योग, नोकरी निमित्त हिंजवडी आय टी परिसरात येणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड मोठी आहे. त्या तुलनेत या ठिकाणचे रस्ते मात्र अरुंद आहेत. याशिवाह या रस्त्यांची अवस्थाही अत्यंत दयनीय झाली आहे, रस्त्यावर जागोजागी लहान मोठे खड्डे पडले आहेत. पावसामूळे हे रस्ते अधिकच खड्डेमय आणि चिखलमय झाले आहेत. मेट्रोचे काम सुरू असल्याने काही ठिकाणी रस्त्याची रुंदी कमी होऊन वाहतूक कोंडीत आणखी भर पडत आहे. गेल्या आठवड्यात भूमकर चौकातील उड्डाणपूलाखाली पावसाच्या पाण्याचे अक्षरशः तळे साचले होते. या सर्व कारणांमुळे येथून जाणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याचे सुळे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

नोकरी निमित्त येणाऱ्या नागरिकांना दररोज तासनतास वाहतूक कोंडीत अडकावे लागत आहे. वाहतूक कोंडीची ही समस्या सोडविण्यासाठी या भागातील रस्त्यांची सुधारणा करणे, रस्ते रुंद करणे, आवश्यक ठिकाणी उड्डाणपूल बांधणे, वाहतूक मार्गात बदल करणे, सर्विस रस्त्यांची रुंदी वाढविणे, खड्डे बुजविणे, दुभाजक आणि पदपथांच्या दुरुस्तीची कामे करणे या सारख्या उपाय योजना तातडीने करण्याची गरज आहे. त्याचबरोबर एमआयडीसी परिसराबाहेरील काही ठिकाणी पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे या पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना करण्याचीही गरज आहे, या बाबी लक्षात घेऊन तातडीने योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी खासदर सुळे यांनी केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading