वैराग्याशिवाय भक्ती ही अधोगतीकडे नेणारी ह.भ. प. यशोधन महाराज साखरे यांचे प्रतिपादन
पुणे : आपण आपल्यावर प्रेम करतो त्याहीपेक्षा जास्त प्रेम भगवंतावर करतो त्याला भक्ती म्हणतात. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे परस्परावलंबी आहेत. भक्ती ही वैराग्याशिवाय राहत नाही. भक्ती जर वैराग्याशिवाय असेल तर ती माणसाला अधोगतीला नेणारी आहे, असे प्रतिपादन ह.भ.प. यशोधन महाराज साखरे (साधक आश्रम आळंदी) यांनी केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मासानिमित्त आयोजित कीर्तन महोत्सवात ते बोलत होते. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
ह.भ. प. यशोधन महाराज साखरे म्हणाले , ज्ञानाबरोबर अहंकार येतो तो न येण्यासाठी भक्तीची आवश्यकता आहे. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे परिपक्व असले पाहिजे. हा देह माझा नाही असा अनुभव येतो म्हणजेच देहाचा निरास. मृत्यू म्हणजे देहाचा नाश नाही. मी देह नाही देहभिन्न आत्मा आहे असा अनुभव केला पाहिजे.
ते पुढे म्हणाले, भक्ती, वैराग्य आणि ज्ञान ही तीन अनुष्ठेय साधन आहेत. या तिन्ही साध्याच्या ठिकाणी जाण्याचे साधन म्हणजे देहाचा निरास. देहाच्या नाशाने भक्ती, वैराग्य आणि ज्ञान याची प्राप्ती होते.
