बांगलादेशींकडून भारतीय सीमेवर घुसखोरी
कोलकाता : बांगलादेशात सत्तांतर घडून आले असले तरीही अद्याप शांतता प्रस्थापित झालेली नाही. त्या देशातील अराजकाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशींच्या मोठ्या जमावाने उत्तर बंगालमधील सीमारेषेवरून भारतीय भूमीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. बांगलादेशचे जवान, भारताचे सीमा सुरक्षा दल आणि स्थानिक पोलीस यांनी घुसखोरीच्य प्रयत्नात असलेल्या जमावाला पिटाळून लावले.
आरक्षण विरोधी आंदोलनाने हिंसक वळण घेतल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन भारतात तात्पुरता आश्रय घेतला आहे. तर नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस आज संध्याकाळी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. मात्र, बांगलादेशात सत्तांतर झाले असले तरीही शांतता प्रस्थापित होऊ शकलेली नाही. या पार्श्वभूमीवर अनेक बांगलादेशी नागरिक भारतात घुसण्याचा प्रयत्न करीत आहेत.
या पार्श्वभूमीवर 4 हजार 96 किलोमीटर लांबीच्या भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर सीमा सुरक्षा दलाला रेड अलर्ट देण्यात आला आहे. बीएसएफ कडून सीमारेषेवर करडी नजर ठेवली जात आहे, अशी माहिती बीएसएफच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात ईशान्येतील विघटनवादी आणि दहशतवादी यांचा बिमोड करण्यात आला होता. मात्र, बांगलादेशातील परिस्थिती पाहता प बंगाल दहशतवादाचा तळ बनू शकतो, अशी भीती आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी व्यक्त केली आहे.
